नगर : जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्ह्यातील ३८६ शाळा तात्पुरत्या स्वरूपात अवघड क्षेत्रातील ठरवल्या गेल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या त्यावर २५ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागवल्या जातील. त्यानंतर त्या अंतिम केल्या जातील. करोना संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांमुळे गेली दोन वर्षे ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या नव्हत्या. मात्र आता या बदल्यांची प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने त्यादृष्टीने पूर्वतयारी सुरू केली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील जागा व सोप्या क्षेत्रातील जागा असे वर्गीकरण केले जाते. अवघड क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांना काही सवलती दिल्या जातात. त्यादृष्टीने हे वर्गीकरण केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ३ हजार ५६९ शाळा आहेत. त्यातील अवघड क्षेत्रासाठी ५५१ शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. सीईओ, शिक्षणाधिकारी, कार्यकारी अभियंता, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक यांच्या जिल्हा समितीने या प्रस्तावांची छाननी केली. त्यातील १६५ शाळा अपात्र ठरविल्या गेल्या. उर्वरित ३८६ शाळा अवघड क्षेत्रासाठी पात्र ठरवल्या गेल्या. पेसा क्षेत्रातील शाळा, बीएसएनएलचे मोबाईल रेंज नसलेल्या शाळा, गावात एसटी जाते किंवा नाही याबाबतचा महामंडळाचा दाखला, वर्षभरात २ हजार मिमी. पेक्षा जास्त पाऊस पडणारे व त्यामुळे संपर्क तुटणारी गावे, डोंगरी भागातील गावे, राष्ट्रीय महामार्गापासून १० किमीपेक्षाही जास्त अंतरावर असलेली गावे यापैकी कोणतेही तीन निकष पूर्ण करणाऱ्या गावातील शाळा अवघड क्षेत्रातील गणली जाते. दरम्यान करोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे केली दोन वर्ष प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यंदा त्या अपेक्षित आहेत. त्याची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली. यासाठी राज्यस्तरावर ऑनलाइन बदल्यांचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यासाठी अॅप (सॉफ्टवेअर) तयार केले जात आहे. त्यामध्ये बदलीपात्र शिक्षकांनी आपली माहिती नोंदवायची आहे. बदल्यांच्या प्रक्रियेसाठी शिक्षकांची माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचना तालुका पातळीवरील गट शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.