गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. असं असतानाच भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
विशेष सखोल फेरतपासणी पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर माजलगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाच्यावतीने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपाच्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपा नेत्या प्रीतम मुंडे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याच कार्यक्रमात बोलताना प्रीतम मुंडे यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर नाव न घेता जळजळीत टीका केली. ‘पंकजा मुंडेंच्या जीवावर आमदार होऊन, आमदारकी पचवून, ढेकर देऊन आता तेच लोक पंकजाताईंवर गरळ ओकतात. मात्र, यापुढे असे गरळ ओकणारे लोक नको’, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
प्रीतम मुंडे काय म्हणाल्या?
“पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल असं आपल्याला कधी वाटलं होतं का? आपण पाहिलं की एवढ्या भयंकर परिस्थिती देखील भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी ठिकवून राहिला. प्रत्येक बूथपर्यंत पोहोचून जे बोगस मतदार नोंदवले गेले होते, ते बोगस मतदार आपण कमी करू शकलो. त्यामुळे खऱ्या-खऱ्या मतदारांनी आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिलं. त्यामुळे इकडे देखील आपल्याला तसंच करायचं आहे. आता या ठिकाणी उपस्थित असलेल्यांना वाटत असेल की मी पश्चिम बंगालचं उदाहरण का देत आहे? आपण तर मराठवाड्यात आहोत. आपण तर बीड जिल्ह्यात आहोत. पण तुमची परिस्थिती सध्या पश्चिम बंगालपेक्षा वेगळी आहे का? नाही. तुम्हाला देखील तसाच त्रास आहे की नाही? मग आपण पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलवू शकतो तर बीड जिल्ह्यात का नाही?”, असा सवाल प्रीतम मुंडे यांनी केला.
“शत प्रतिशत भाजपा हा नारा घेऊन आपल्याला चालायचं आहे. मात्र, काही जण पंकजा मुंडे यांच्या जीवावर निवडून येऊन आता तीन वर्ष जवळपास होत आलेत. आमदारकी खाऊन, आमदारकी पचवून, ढेकर देऊन मग पंकजाताईंवर गरळ ओकणारे लोक आपल्याला नको असतील तर या ठिकाणी शत प्रतिशत भाजपाच पाहिजे आणि त्याचीच ही तयारी आहे”, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी आमदार प्रकाश सोळंके यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.
“यापुढे आपल्याला अशा प्रकारच्या कोणत्याही तक्रारी करण्याची संधीच मिळू नये, असं वाटत असेल तर यासाठी आपला माणूस या भागातून निवडून आला पाहिजे. जर आपला माणूस निवडून आणायचा असेल तर त्याची पूर्व तयारी आपल्याला करायची आहे. शेतकऱ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर, सध्या आपल्याला जमिनीची मशागत करायची आहे, म्हणजे जेव्हा आपली जमीन तयार होईल आणि चांगला पाऊस पडला की आपल्याला पेरणी करून चांगलं पीक घेता येईल”, असंही प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.
