अर्थव्यवस्थेचे नियोजनपूर्वक संचलन, देशात असहिष्णुता निर्माण करणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाई आणि विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन मोदी सरकारने काम केल्यास देशाचा निश्चित विकास होऊ शकेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केले.
इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ‘नवीन सरकार व भारताच्या अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती’ या विषयावर ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, जागतिकीकरणाचा करार झाला त्या वेळी देशातील परकी गंगाजळीची अवस्था नाजूक होती. तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंह यांनी पंतप्रधान नरसिंह राव यांना कटू निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारणेच्या दिशेने वाटचाल करू लागली. वाजपेयी सरकारनेही त्याच धोरणांचा अवलंब केल्यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात आíथक वाढीचा दर ९ टक्क्यांपर्यंत पोहोचला. मात्र २००८ नंतर अमेरिकेतील आíथक समस्येनंतर अर्थव्यवस्थेची घसरण झाली. मात्र आíथक मंदीच्या वातावरणात अन्नधान्य उत्पादन, परकी गुंतवणूक, उद्योग आणि सेवा क्षेत्रात देश प्रगतिपथावर होता. संसदेत विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सहमतीचे राजकारण करण्याचे कौशल्य सध्याच्या सरकारकडे नसल्यामुळे अध्यादेश काढण्याचा सपाटाच सुरू आहे. देशाच्या हिताच्या कायद्यांना आणि निर्णयांना विरोधासाठी विरोध करण्याची काँग्रेसची भूमिका नाही.