“गिरीष बापट यांच्यामुळे युतीधर्म पाळला गेला नाही. त्यामुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनीच पुणे जिल्ह्यात शिवसेनेला संपवलं, हे गिरीश बापट म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी ‘शकुनीमामा’आहेत”, अशी घणाघाती टीका माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदार संघातील जुन्नर-शिरूर-खेड या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला होता. मात्र, यावेळी शिवसेनेला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. या अपयशाचे खापर आढळराव पाटील यांनी गिरीष बापट यांच्यावर फोडले आहे. “खासदार गिरीषबापट म्हणजे पुणे जिल्ह्यातील शकुनीमामा आहेत. या शकुनीमामाने शिवसेनेला संपवले. पालकमंत्र्यांना मी पत्र द्यायचो, पण मला त्यांच्याकडून कोणताच रिप्लाय येत नव्हता. मात्र काम मंजूर झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, सरपंच पदाधिकारी यांच्या नावाने पत्र द्यायची. अशा प्रकारे यांनी जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचे काम केले”, या शब्दांत चाकण येथे झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना पाटील यांनी गिरीष बापट यांच्यावर टीका केली.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निकालच्या १२ दिवसानंतरही सुटलेला नाही. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. परंतु अद्यापही राज्यात नव्या सरकारची स्थापना झालेली नाही. भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेचा संघर्ष दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे.