राहाता : मुंबईसह राज्याला असुरक्षित करणाऱ्या व्यक्तींसमवेत आर्थिक लागेबांधे उघड झाल्यानंतरही मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत? असा सवाल भाजपा नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.
मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यांनतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र या संदर्भात मुख्यमंत्र्यानी मौन पाळले याचे आश्चर्य वाटत असल्याकडे लक्ष वेधून विखे म्हणाले की, १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेदना अद्यापही कायम आहेत. असंख्य निरापराध माणसे मृत्युमुखी पडल्याच्या स्मृती विरलेल्या नाहीत. या घटनेशी संबंध असलेल्या व्यक्तींशी मंत्री नवाब मलिक यांचे मनी लाँडिरग झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक झाली तरीही मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार नसतील, तर देशहिताची ही प्रतारणाच म्हणावी लागेल.




राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे एकएक कारनामे उघड होत आहेत. यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शंभर कोटी रुपयांच्या घोटाळय़ातील सहभागामुळे राजीनामा घेणारे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेत पाठराखण करीत असल्याकडेही विखे यांनी लक्ष वेधले.
मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर नेमका कोणाचा दबाव आहे? नवाब मलिकांचे बॉम्बस्फोटातील आरोपीशी उघड झालेल्या अर्थिक संबंधांना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे. अशा लोकांना बरोबर घेऊन शिवसेना राज्य करणार का? असा प्रश्नही विखे यांनी उपस्थित केला. भारतीय जनता पक्षाने मंत्री मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. यासाठी आंदोलन सुरू केली आहेत. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजपासून रस्त्यावर उतरले आहेत. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही विखे यांनी दिला.