येत्या १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील प्रस्तावित सभेला परवानगी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परवानगीवरून बरीच चर्चा सुरू झाली होती. विशेषत: मनसेचा पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून मोठा वाद उफाळला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? यावरून तर्क-वितर्क सुरू झाले होते. यासंदर्भात मनसेकडून परवानगी मिळणारच असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. अखेर ती परवानगी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. राज ठाकरेंच्या सभेला सशर्त परवानगी दरम्यान, औरंगाबादमधील सभेला सशर्त परवानगी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या अटी नेमक्या कोणत्या असतील? याविषयी अद्याप पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मात्र, या अटींमध्ये जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य टाळणं आणि वैयक्तिक टीका न करणं या अटींचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. काय आहेत अटी? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. यानुसार. १- सभा ४.३० ते ९.३० या दरम्यान आयोजित करण्यात यावी. २- सभेत सहभागी होणाऱ्यांनी असभ्य वर्तन न करता स्वयंशिस्त पाळावी. ३- सभेसाठी १५ हजाराहून जास्त लोकांना निमंत्रित करू नये. ४- सभेमध्ये शस्त्र, तलवारी, स्फोटकं बाळगू नयेत. ५- वंश, जात, धर्म, भाषा, प्रदेशावरून चिथावणी देणारं वक्तव्य करू नये. ६- पोलिसांनी नेमून दिलेल्या मार्गानंच प्रवास करावा. ७- सभेदरम्यान चेंगराचेंगरी वा गोंधळासारखे प्रकार घडल्यास आयोजक जबाबदार असतील. ८ - सर्व अटींची माहिती आयोजकांनी कार्यकर्त्यांना द्यावी ९- सुव्यवस्था राखण्यासाठी मजबूत बॅरिकेट्स उभारावेत १०- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे ११- कार्यक्रमादरम्यान अत्यावश्यक सुविधांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी. १२- सभेच्या दिवसी वाहतुकीसंदर्भातील अधिसूचना सभेला येणारे वक्ते, कार्यकर्ते यांना बंधनकारक असेल १३ - सभेसाठीच्या वस्तू, जनरेटरची व्यवस्था आधीच करावी १४ - सभेदरम्यान अन्नदान किंवा मिठाई वाटप होणार असेल, तर त्यातून विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी १५ - कार्यक्रमाचं ठिकाण किंवा वेळ यामध्ये कोणताही बदल करू नये