Raj Thackeray-Uddhav Thackeray Victory Rally : हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर आज जल्लोष साजरा करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने मुंबईत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तसेच आगामी काळात मनसे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या युतीबाबत देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संकेत दिले आहेत.

या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका करत मोठा इशारा दिला. ‘तुमच्या हातात सत्ता असेल, पण ती सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता रस्त्यावर आहे’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. दरम्यान,हा मेळावा संपल्यानंतर राज ठाकरे यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच आपण मेळाव्यात एक उल्लेख करायचं राहून गेल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं, त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले. त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप

आज झालेल्या मेळाव्यात व्यासपीठावर फक्त दोन्ही ठाकरे बंधू होते. या मेळाव्यात राज ठाकरे यांचं आधी भाषण झालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. मात्र, राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर ते जेव्हा व्यासपीठावर जाऊन बसले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या पाठीवर थाप मारली आणि त्यांचं कौतुक केलं. तसेच राज ठाकरे यांच्या कानात काहीतरी कुजबुज करताच राज ठाकरे हे देखील दिलखुलास हसल्याचं पाहायला मिळालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांची युती होणार?

मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना (ठाकरे) युती होणार असल्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, “राजने भाषणाच्या सुरुवातीला माझा उल्लेख सन्माननीय असा केला. त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशीच करत आहे. राजने त्याच्या भाषणात मराठीचा मुद्दा व हिंदीच्या सक्तीबाबत अप्रतिम मांडणी केली. त्यामुळे माझ्या भाषणाची आवश्यकता वाटत नाही. वैयक्तिक मला वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाट अण्णाजीपंतांनी दूर केला. आता तुमच्याकडून अक्षता टाकण्याची अपेक्षा नाही. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी”, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं.