Raj Thackeray And Uddhav Thackeray Reunion: राज ठाकरे यांनी २००५ मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर वेगळे झालेले ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, दोन्ही ठाकरे बंधुंनी महाराष्ट्रासाठी तडजोड करण्याचे आणि एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्याचे वक्तव्य केले आहे. त्यानंतर एका वेगळ्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
एकत्र यावेच लागेल
दरम्यान आज शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीच्या विषयावर ऐकमेकांशी बोलणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “का नाही बोलणार? एक लक्षात घ्या मी तुम्हाला वारंवार सांगतोय. माझी आत्ताच उद्धव साहेबांशी चर्चा झाली. मी त्यांच्याशी सविस्तर बोललो आहे. ही मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसावर कोणी घाव घातल असेल, तर एकत्र यावेच लागेल. पण, आम्ही वाट पाहू. यापेक्षा आणखी चांगले घडण्याची वाट पाहू.”
मराठी माणसावर उपकार होतील
“राज ठाकरे याक्षणी आम्हाला भाजपा आणि एसएनशी (शिंदे गट) यांच्याबरोबर दिसत आहेत. आमच्या दृष्टीने ते महाराष्ट्राच्या हिताचे काम करत नाहीत. ते राज ठाकरे यांचा वापर करून राज्यातील मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायचे कारस्थान रचत आहेत. हे राज ठाकरे यांच्या लक्षात आले असेल, तर हे मराठी माणसावर उपकार होतील”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
राज ठाकरे यांची भूमिका चांगली
संजय राऊत पुढे म्हणाले की, “राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका पुढे येत असेल, तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. कारण बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेतील प्रवास आम्ही विसरू शकत नाही. उद्धव ठाकरे विसरू शकत नाही. आमच्यात मतभेद झाले हे खरे आहे. कारण, तुम्ही महाराष्ट्राच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना घरात घेतले. हा आमच्यासाठी मतभेदाचा विषय राहिला.”
राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटींवर भाष्य
यावेळी, संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढलेल्या भेटीगाठीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “भेटी होतात म्हणून काय झाले. ते (एकनाथ शिंदे) अमित शाह यांनाही भेटतात. ते राज ठाकरेंना सांगायला गेले असतील, फडणवीस माझे ऐकत नाहीत. अमित शाह माझे ऐकत नाहीत. उद्या आमच्या दारत पण येतील, बघा आमचे ऐकत नाहीत म्हणून.”