Operation Sindoor Raj Thackeray Reaction: भारतीय लष्कराने आज पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या या कारवाईनंतर पहलगामच्या पीडितांबरोबर सर्वसामान्यांनीही याचे कौतुक केले आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहे. दरम्यान या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी, “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं”, असं म्हटले आहे.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानस्थित दहशवाद्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आहे.
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर हे भारतीय लष्कराने ही कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर देशभरातून समाधन व्यक्त केले जात आहे. दरम्यान भारताने दिलेल्या या प्रत्युत्तराचे सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातील नेत्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे.
दरम्यान आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे केलेल्या लष्करी कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, “पहलगामला जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी जे पहिले ट्विट केले त्यामध्ये सांगितले होते की, ज्यांनी हल्ला केला त्या दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला पाहिजे जो त्यांच्या पुढील पिढ्यांनाही लक्षात राहिल. पण, दहशतवादी हल्ल्याला उत्तर उद्ध नसतं. दहशतवाद्यांनी अमेरिकेत ट्वीन टॉवर्स पाडले म्हणून त्यांनी युद्ध नाही केले. त्यांनी दहशतवादी ठार मारले.”
यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “मुळात ही गोष्ट का घडली हे लक्षात घेण्यासारखे आहे. आपण थोडासा आपला विचार करणेही गरजेचे आहे. पाकिस्तानला काय बरबाद करणार आहे, तो आधीच बरबाद झालेला देश आहे. ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केले ते अजून सापडलेले नाहीत, ज्या पर्यटन स्थळावर हल्ला झाला तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती? हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत.”
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओजेकेमधील जैश-ए-मोहम्मदसह अनेक दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, “पहलगाममधील हल्ला अत्यंत क्रूर होता, ज्यामध्ये मृतांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या घालून त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांची हत्या करण्यात आली. हा हल्ला स्पष्टपणे काश्मीरमधील सामान्य परिस्थिती बिघडवण्याच्या उद्देशाने होता.”