महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना, राज्यातील पेपर फुटीच्या घटनांवरून निशाणा साधला. शिवाय, ओबीसी आरक्षणाच्या गोंधळावरून राज्यातील नियोजित निवडणुकांना होणारा विलंब यावरह राज ठाकरे यांनी बोट ठेवत, राज्य सरकारवर टीका केली.

पेपर फुटीच्या प्रकरणावरून माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “हे काय पहिल्यांदा होतंय असं नाही, असं काही नाही की पेपर फुटला तो पहिल्यांदा फुटला आहे. इतक्या वर्षे अनेकदा फुटला. पण ज्यांनी फोडला ते फुटले नाहीत अजून, म्हणून सारखे पेपर फुटतात. ज्याप्रकराचा शासन म्हणून एक वचक असायला पाहिजे, तो वचक राहत नाही मग.”

उद्धव ठाकरे, सचिन वाझे, मुकेश अंबानी… आणि बाँब ठेवलेली गाडी; राज ठाकरेंचं भाकीत

तसेच, “आपल्या देशात निवडणुका येतच राहतात, म्हणून तुम्ही काय निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं प्रत्येकवेळी बोलू शकत नाही. फेब्रवारी तारखेनुसार निवडणुका व्हायला, एकतर औरंगाबादची निवडणूक वर्षभर पुढे गेलेली आहे. ज्यांच्या निवडणुका आहेत, त्याबद्दल खात्री नाही की त्या होतील की नाही होणार, की त्या आणखी सहा-आठ महिने पुढे जातील, की त्यासाठी म्हणून ओबीसीचं हे नवीन प्रकरण सुरू केलं आहे. केंद्राने मोजायचे का? राज्याने मोजायचे? या मोजामोजीत सगळ्या निवडणुका पुढे ढकलायच्या. कारण, कोणी सामोरं जाणार नाही असं. कारण, ओबीसी समाजात आज अनेक गोष्टी सुरू झाल्या, पाट्या लावायला सुरूवात झाली आमच्याकडे मत मागायला येऊ नका म्हणून. त्यामुळे हा सगळा जो गोंधळ घातला गेला आहे. यांची हिंमत नाही त्यांच्याकडे परत जायची. काहीतरी कारणं काढून हे निवडणुका पुढे ढकलतील. आता हे निवडणुका पुढे ढकलतील का वेळेवर घेतील, याची कुठलीच खात्री नसताना. जर समजा मी बाहेर पडलो असेल आणि जर मी माझ्या पक्षातील लोकांना बोलत असेल, तर त्याकडेही मी कुठल्याही तरी अर्थानेच बाहेर पडलो असंच बघायचं का? आणि अर्थ असणारच आहे ना तुम्ही देखील आज माझ्याकडे कुठल्यातरी अर्थानेच आला आहात ना? शेवटी राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्षात मी जेव्हा बाहेर पडणार त्याला काही ना काही अर्थ असणारच. मला नाशिकला विचारलं तुमची रणनिती काय? मग काय रणनिती सांगायाची का?” असं देखील राज ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं.