Raju Patil on Raj Thackeray : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत शिवसेना (शिंदे) आणि भाजपा एकत्र निवडणूक लढले. मात्र, निकाल जाहीर होताच शिंदेंनी भाजपाला बाजूला सारून मनसेची साथ घेण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार, मनसेच्या ५ नगरसेवकांच्या साथीने शिंदेसेने महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बसणार आहे. दरम्यान, या राजकीय समीकरणावर राज ठाकरे यांनी काल (२३ जानेवारी) षण्मुखानंद सभागृहात झालेल्या भाषणात भाष्य केलं. अशा राजकारणामुळे शिसारी येते असं ते म्हणाले. त्यामुळे शिंदेसेना आणि मनसे युती राज ठाकरेंना विश्वासात न घेता झाली का? असा प्रश्न उपस्थित होतो. यावर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारण पाहून शिसारी येते – राज ठाकरे
कल्याण डोंबिवलीतील मनसे-शिंदेसेनेच्या युतीला राजू पाटील यांचा पाठिंबा आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ही युती झाली. मात्र, या युतीवर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचं दिसतंय. “राजकारणात माणसांचा लिलाव सुरू आहे, हे चित्र पाहायला बाळासाहेब हयात नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. आजचे राजकीय चित्र ते पाहू शकले नसते. मी काय सांगितले आणि तुम्ही हे काय केले, असे त्यांना वाटले असते. हिंदुत्त्वाचा बाजार पाहून बाळासाहेब व्यथित झाले असते. या देशातील हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला बाळासाहेबांनी शिकविले. तसंच, आज राजकारणात माणसांचा लिलाव सुरू आहे, हे पाहून आपण व्यथित झालो असून याची शिसारी येते”, अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली.
सावधगिरी म्हणून शिंदेंना साथ दिली
कल्याण डोंबिवलीतील मनसे-शिंदेसेना युतीबाबत राजू पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, “भाजपाकडून आमच्या नगरसेवकांना त्यांच्या पक्षात जाण्याकरता फोन यायला लागले. भाजपाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होईल किंवा आमिष दाखवलं जाईल म्हणून मी आमच्या नगरसेवकांना बाजूला घेऊन गेलो. असं राजकारण घडणार असेल तर मला ते कुठेतरी थांबवायचं होतं, माझ्या पक्षाचे नगरसेवक फोडले जाऊ नये म्हणून सावधगिरी म्हणून हे पाऊल उचललं होतं. मी काय केलं याबाबत मी माझ्या साहेबांना (राज ठाकरेंना) कळवलं होतं. मी पक्षहितासाठी केलं होतं. बाकी दुनियेला काय वाटतं, याने मला काहीच फरक पडत नाही”, असं राजू पाटील म्हणाले.
