अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा बळीराजावर संकट कोसळले आहे. याआधीच अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषतः द्राक्ष बागायतदार आणि कांदा उत्पादकांना याच मोठा फटका बसला आहे.

सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे काढायला आलेला कांदा खराब झाला आहे. नासलेला कांदा हा विकला जात नाही अशी परिस्थिती आहे. जो काही कांदा विकला गेला त्याला क्विंटलमागे खूप भाव मिळाला आहे. अशाच एका शेतकऱ्याला कमी भाव मिळाल्यानं आता सरकारचे १३ वं घालावे का ? अशी संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. ” या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का ? सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बापू कावडे या शेतकर्यांने २४ पोते कांदे रूद्रेश पाटील या व्यापा-याला विक्री केले. जवळपास ११२३ किलो कांदे विकून या माझ्या बळीराजाला १६६५ रूपये मिळाले. हमाली , तोलाई , मोटार भाडे वजा जाता १३ रूपये बापू कावडे या शेतक-यास शिल्लक राहिले. या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का ? “: असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

फक्त सोलापूरमध्ये नाही तर राज्यात अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. कांदा खराब झाला असल्याने पुढील काही दिवसात बाजारात कांद्याची आवक कमी होणार असल्याची भिती व्यक्त होत आहे.