राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत ‘एमआयएम’ने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं याच मुद्द्यावर शिवसेनेला लक्ष्य केलंय. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर यासंदर्भात मनसेनं पहिली प्रतिक्रिया नोंदवलीय. (राज्यसभा निवडणुकीचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही येथे क्लिक करुन पाहू शकता.)

एमआयएमनं काय म्हटलं?
इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत एमआयएम महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. “भाजपाचा पराभव करण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील,” असं इम्तियाज जलील यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पुढील ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले आहे की, “आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आलं आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,” असंही इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

Image

मनसेचा टोला
एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाणा साधलाय. ‘राज्याची शोभा होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे,’ असा टोला काळे यांनी लगावलाय. पुढे बोलताना त्यांनी, ‘त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे,’ असंही म्हटलंय.

सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपामध्ये चुरशीची लढत आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. शिवसेना व भाजपाला अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष व छोटय़ा पक्षांची गरज लागणार आहे. अपक्ष व छोटय़ा पक्षांचे २९ आमदार असून, ते कोणती भूमिका घेतात यावर शिवसेना व भाजपाचे भवितव्य अवलंबून आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने मतांचे नियोजन करताना परस्परांना फायदा होईल, अशी व्यवस्था केली आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांनी दुसऱ्या पसंतीची मते शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला द्यावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांनी गुरुवारी सायंकाळी पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते कोणाला द्यायची याचे प्रशिक्षण आमदारांना देण्यात आले.

शिवसेना आणि भाजपामध्ये अतिरिक्त जागेवरून चुरस निर्माण झाली असतानाच, दुसरीकडे भाजपाने काँग्रेस उमेदवाराला पराभूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचा उमेदवार पराभूत होणे, हे भाजपासाठी अधिक फायद्याचे आहे. त्यातून राज्यसभेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊ शकेल. मात्र, बाहेरचा उमेदवार आणि आमदारांमधील नाराजी यातून काँग्रेसने खबरदारी घेतली आहे. नाराज आमदारांशी पक्षाच्या नेत्यांनी वैयक्तिक चर्चा केली आहे.

खुल्या पद्धतीनं मतदान
राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. त्यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवून मतदान करावे लागते. आमदाराने पक्षादेश धुडकावल्यास त्या आमदाराच्या विरोधात पक्षाला पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करता येते. अपक्षांना मात्र मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते. राज्यसभा निवडणुकीत आमदारांची मते बाद होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. हरयाणामध्ये काँग्रेसच्या १४ आमदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पेनाऐवजी वेगळय़ा शाईच्या पेनाचा वापर केल्याने ही मते बाद ठरली होती. गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांनी मते भाजपाच्या नेत्यांना दाखविल्याने ती मते बाद ठरली होती. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण आपापल्या आमदारांना दिले आहे.

उमेदवार : प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजपा), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजपा), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजपा)