केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात चर्चा झाली. या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजपासोबत निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी 'आरपीआय'ला सत्तेत चांगला वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी आठवलेंनी फडणवीसांकडे केली आहे. 'आरपीआय' हा पक्ष २०१२ पासून भाजपासोबत आहे, त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. आरपीआयला नक्कीच सत्तेचा वाटा मिळेल, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही कसल्याही परिस्थितीत जिंकणार आहोत. आरपीआयची सर्व ताकद भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असेल, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली आहे. हेही वाचा- “गरिबाच्या पोरीचं प्रेम म्हणजे ती पळाली अन् श्रीमंताच्या पोरीचं प्रेम म्हणजे…”, शरद पवारांचं नाव घेत बच्चू कडूंची टोलेबाजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास आरपीआयला जागा मिळणार आहे का? याबाबत विचारलं असता रामदास आठवले म्हणाले, "याबाबत आता कसलीही चर्चा झाली नाही. परंतु यापूर्वी मी दोन वेळा मंत्रिपदासाठी फडणवीसांशी चर्चा केली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी आरपीआयचा नक्की विचार केला जाईल, असं फडणवीसांनी मला सांगितलं आहे. तसेच राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एक जागा आम्हाला देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. या मागणीवर देवेंद्र फडणवीस नक्की विचार करतील, असा आम्हाला विश्वास आहे" असंही आठवले म्हणाले.