राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. यावरून यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नसून त्यांनी अशी विधाने टाळली पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच राज्यपालांना होत असलेला विरोध राजकीय असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. हेही वाचा - “अहो, तुमचे आघाडी सरकार…”, शिंदे गटाचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, ‘त्या’ दाव्याचा दिला संदर्भ! काय म्हणाले रामदास आठवले? “छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील प्रेरणास्थान होतेच, आजही ते सर्वांचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळे राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मात्र, त्यांच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे, ते राजकीय आहे. राज्यपालांसारख्या व्यक्तीचा अशा प्रकारे अपमान करणं योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. हेही वाचा - VIDEO: “…तेव्हा ठाकरे गटात उरलेल्या १५ पैकी आठ आमदार शिंदे गटात येतील”, खासदार प्रतापराव जाधवांचा दावा “राज्यपालांनी सांगितलं आहे की ते आता कमी बोलणार आहेत. त्यामुळे आता त्यांनी अशा प्रकारची व्यक्तव्य टाळली पाहिजे असं आमचं मत आहे. अशा प्रकारे कोणाच्या भावना दुखावणारे व्यक्तव्य राज्यपाल म्हणून करू नये”, असेही ते म्हणाले.