अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना शनिवारी खार पोलिसांनी नाट्यमय घडामोडीनंतर ताब्यात घेतलं. मात्र यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यामधून बाहेर पडताना पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच यावेळी सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत चप्पलाही फेकल्या. या हल्ल्यामध्ये सोमय्या किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीच्या डाव्या बाजूची काच दगडफेकीमध्ये फुटली असून सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली. याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांच्या वर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य केले आहे. सध्या महाराष्ट्रात आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे रावसाहेनिर्माण झाल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. “राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेल्याने राज्यातील जनतेला सुद्धा चिंता आहे की महाराष्ट्राचा बिहार होतो की काय. जगाच्या पाठीवर आपल्या देशाच्या पोलिसांचे नाव आहे. तसेच देशामध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांचे नाव आहे. पण सत्ताधारी तिन्ही पक्ष पोलिसांना बदनाम करण्याचे काम करत आहे असे मला वाटते. कारण गेल्या एका महिन्याच्या घडामोडींकडे बघितले तर याआधीही पुण्यात सोमय्यांवर हल्ला झाला पण आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही. पोलखोल यात्रांवर हल्ले होत आहे. सरकारच्या प्रतिनिधीने राणा दाम्पत्याचे मत वळण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांनी ऐकले असते,” असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले. “राणा दाम्पत्याला भेटायला किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर शिवसैनिकांच्या सांगण्यावरुन किरीट सौमय्यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे या राज्यात ज्यांच्यावर हल्ले होत आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. या सरकारने राज्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण केली आहे. आज जरी तुम्हाला वाटत असलं तरीही या देशातली जनता याचे निरीक्षण करत असते. आणीबाणीनंतर काँग्रेसचे सरकार जाऊन जनता पक्षाचे सरकार आले होते. याला उत्तर येणाऱ्या निवडणुकीत जनता देईल,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.