रत्नागिरी: आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे आंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. या युद्धाचा परिणाम आंबा निर्यातिवर थेट होण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे. यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. आखाती देशात मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक वास्तव्यास आहेत. त्यामुळे भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आंबा निर्यात केला जातो. मात्र, सद्यस्थितीत युध्द न थांबल्यास आंबा निर्यात पुर्नत: ठप्प होणार आहे.

कोकणातील हापूस आंब्याच्या निर्यातीवर परिणाम होईल का, याबाबत चिंता व्यक्त होत असताना अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) यांनी स्पष्ट केले आहे की, हापूस निर्यातीवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. मात्र, युद्धामुळे हवाई आणि समुद्री वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्यास निर्यातीत तात्पुरती अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उत्पादनात मोठी घट अपेक्षित

यंदा कोकणात हापूस उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षाप्रमाणेच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही आंबा बागायतदारांना बसला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांत हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. अंदाजे १ लाख ते १.८२ लाख हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड असून, त्यातून दरवर्षी सुमारे ३,०८,४८० मेट्रिक टन उत्पादन घेतले जाते.

निर्यात आणि बाजारपेठ

मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. एकूण निर्यातीपैकी ४० टक्के निर्यात वाशी मार्केटमधून होते. त्यापैकी ३० टक्के माल आखाती देशांमध्ये जातो. हापूस प्रामुख्याने दुबई, बहरीन, कतार, दोहा, कुवेत, सौदी अरेबिया आणि जॉर्डन या देशांमध्ये निर्यात केला जातो. उर्वरित १० टक्के माल इतर देशांमध्ये पाठवला जातो. युद्धामुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास निर्यात होणारा मध्यम आकाराचा आंबा स्थानिक बाजारपेठेतच अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात आंब्याची उपलब्धता वाढल्यास दरावर दबाव येऊ शकतो.

सध्या वाशी मार्केटमधील परिस्थिती

सध्या कोकणातून वाशी मार्केटमध्ये येणाऱ्या पेट्यांची संख्या कमी आहे. दररोज ६० ते ७० पेट्या बाजारात दाखल होत आहेत. त्यापैकी १० टक्के माल रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. सध्या ५ ते ७ डझनच्या हापूस पेटीला ६ ते १२ हजार रुपये असा चांगला दर मिळत आहे.

हवामान व किडीचा फटका

यावर्षी हापूस आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित उष्णता न मिळाल्याने मोहर नीट फुलला नाही, त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता वाढली आहे. याचा फटका आंबा आणि काजू बागायतींनाही बसला आहे.

दरावर आवकेचा परिणाम

तज्ञांच्या मते, बाजारात एक लाखापेक्षा जास्त पेट्यांची आवक झाल्यास दर घसरण्याची शक्यता आहे. मात्र आवक कमी राहिल्यास दर स्थिर राहू शकतात. भारतातून एकूण आंबा निर्यात २९ हजार मेट्रिक टन आहे. त्यात महाराष्ट्र राज्यातील निर्यात साडे पाच मेट्रिक टन आहे. अडीज मेट्रिक टन आंबा कोकणातील आहे. एक लाखा पेक्षा जास्त पेट्यांची आवक झाल्यास आंब्याचे दर घसरतील. मात्र आवक घटल्यास दर स्थिरच राहणार आहेत, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहेत.

“२५ मार्चनंतर हापूसची मोठी आवक एकाचवेळी बाजारात येण्याची शक्यता आहे. नेमक्या याच काळात युद्ध सुरू राहिले तर निर्यातीला फटका बसू शकतो. युद्धाच्या कालावधीवरच हापूस निर्यातीचे भवितव्य अवलंबून आहे.” – संजय पानसरे, वाशी मार्केट

“यावर्षी आंबा उत्पादन कमी असणार आहे. त्यामुळे बागायतदारांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी असल्याने स्थानिक बाजारातही पेट्या कमी असतील. युद्धस्थिती कमी झाल्यास आखाती देशांसह इतर देशांमध्ये निर्यात वाढून चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.” – राजाराम पटवर्धन, आंबा बागायतदार, रत्नागिरी