एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमध्ये ठाण मांडून आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. मात्र अजूनतरी कोणताही प्रतिसाद या बंडखोर आमदारांनी दिलेला नाही. याच कारणामुळे शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. घाण गेली म्हणत नव्याने पक्ष उभा करण्याचा सल्ला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. असे असताना आता बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी जी शिवसेना आहे ती आम्हीच आहोत. कशात विलीन व्हायचं ते त्यांनी ठरवावं, असा सल्ला उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना दिला आहे.

हेही वाचा >>> शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अशीच कायम राहील? शरद पवार म्हणतात, “आज तरी…!”

“चौधरी यांना गटनेते म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयाला आम्ही आव्हान देऊ. १६ लोक ५५ लोकांचा निर्णय घेऊ शकणार नाहीत. जी शिवसेना आहे ती आम्हीच आहोत कारण आमच्याकडे सगळे लोक आहेत. उरलेल्या १४ लोकांनी आमच्याबरोबर यायचं की विलिनिकरण करायचं याचा त्यांनी विचार करावा, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> “बंड जास्त दिवस राहणार नाही, कारण…”; चंद्रकांत खैरेंचा बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा

तसेच, “जिकडे बहुमत असते त्यांचाच पक्षनेता असतो. जो विधिमंडळ पक्ष असतो तो मूळ पक्षापासून वेगळा असतो. त्याला वेगळं अस्तित्व असल्यामुळे त्याची नोंदणी सहा महिन्यांच्या आत करावी लागते. आमची ही नोंदणी झालेली आहे. यावर ५५ आमदारांच्या सह्या आहेत. आमदारांनी एकमताने एकनाथ शिंदे यांना आपला नेता म्हणून त्यावेळीच निवडलेलं आहे,” असे देखील केसरकर म्हणाले.