औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचातीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीवरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटात वादाला सुरुवात झाली आहे. वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उमेदवार पळवले. या निवडणुकीसाठी त्यांना मोठी रसद मिळाली होती, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

चंद्रकांत खैरे यांच्या आरोपाला शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं विधान शिरसाट यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “आधी स्वत:च्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…” रावसाहेब दानवे यांची इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका!

चंद्रकांत खैरे यांच्या टीकेबाबत विचारलं असता, शिरसाट म्हणाले, “चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. निवडणुकीत ज्यांचा विजय होतो, तो आपण नम्रपणे स्वीकारला पाहिजे. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असता तर शिंदे गटाला हादरा, शिंदे गटाची पराभवाला सुरुवात, असं सगळीकडे म्हटलं गेलं असतं. आता जे उमेदवार निवडून आले आहेत. ते पूर्वीसुद्धा सदस्य होते, त्यांचं नेतृत्व मीच करत होतो. ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास ४० हजार मतदार आहेत. या ४० हजार मतदारांनी आम्हाला बहुमत दिलं आहे, याचा त्यांनी स्वीकार करायला हवा. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असता तर आम्हीही याचा स्वीकार केला असता.”

हेही वाचा- “…तर हिंदुंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल” शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी नितेश राणेंचा इशारा

चंद्रकांत खरैंकडून केलेल्या आरोपांचा नेमका अर्थ काय? असा सवाल विचारला असता, शिरसाट पुढे म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांना सध्याच्या घडीला ‘मातोश्री’ला खूश करायचं आहे. मीच कसा निष्ठावंत आहे, हे उद्धव ठाकरेंना दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमुळे ठाकरे गटाच्या पराभवाला झालेली ही सुरुवात आहे, असंही शिरसाट यावेळी म्हणाले.