केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून मोठा विरोध झाला. बिहार उत्तप्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या भागातील तरुणांनी रसत्यांवर उतरत जाळपोळ केल्याच्या घटनाही घडल्या होत्या. मात्र, यानंतरही केंद्र सरकार अग्निपथ योजनेवर ठाम असून लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे तिनही लष्कर दलाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून हवाईदल पाठोपाठ लष्कराकडूनही या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यास येणार आहे. महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.

हेही वाचा- १९ लाख शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या ‘स्मार्ट प्रोजेक्ट’ला गती द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई सर्कलसाठी भरती प्रक्रिया

महाराष्ट्रात होणारी ही भरती प्रक्रिया मुंबई सर्कलसाठी होणार आहे. २० सप्टेंबरपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून १० ऑक्टोंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार आहे. ठाण्याच्या मुंब्रा येथील श्री अब्दुल कलाम आझाद क्रिडा मैदानावर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. लष्करातील अग्निवीर जनरल ड्यूटी, टेक्नीकल, क्लार्क, टेक्नीकल स्टोअर किपर आणि अग्निवीर ट्रेडस्मन या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी ८ वी आणि १० वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. केवळ मुंबई विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, नंदुरबार आणि धुळे या शहरातील तरुणांना या भरती प्रक्रियेत समाविष्ट होता येणार आहे.

हेही वाचा- वातानुकूलित लोकलसाठी वाणगाव, भिवपुरीत कारशेड उभारणार; संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण

ऑनलाईल अर्ज करण्याचे आवाहन

इच्छूक तरुणांना लष्कराच्या http://www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळावर अर्ज करवा किंवा 022-22153510 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. अग्निपथ योजनेत भरतीअंतर्गत शारिरिक चाचणी, आरोग्य चाचणी आणि कॉमन एंटरन्स टेस्ट घेतली जाणार आहे. या सर्व परीक्षानंतर गुणवत्ता यादी (मेरीट लिस्ट) जाहीर केली जाणार असून त्यानुसार तरुणांची लष्करात भरती करण्यात येणार आहे. येत्या नोंव्हेबरमध्ये कॉमन एंटरन्स टेस्ट घेण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक तरुणांनी संकेतस्थळावर ऑनलाईल अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.