दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जात असलेल्या भाजपमध्ये खासदार-आमदार यांचा याराना जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर नव्याने उदयास आला असून दोघांमध्ये असलेली कटुता संपुष्टात आली असल्याची घोषणा उभयतांनी आटपाडीमध्ये केली. खासदार संजयकाका पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वैमनस्य संपुष्टात आल्याने याचे सकारात्मक पडसाद खानापूर आटपाडीसह जत तालुक्यातही पाहण्यास मिळणार आहेत.

लोकसभेच्या२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी खासदार, आमदार एका व्यासपीठावर होते. पडळकर यांनीही मोदी लाटेवेळी भाजपच्या विजयासाठी सभा गाजविल्या होत्या. मात्र, राज्यात आघाडीची सत्ता जाऊन भाजपप्रणित युतीच्या हाती सत्ता येताच दोघांमध्ये राजकीय संघर्ष टोकाला गेला होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही हा संघर्ष वाढणारा नाही याची दक्षता घ्यायला विलंब केला. यातून एकमेकांना बघून घेण्याची प्रसंगी आमच्या गावावर जाउन दाखव असा गर्भित इषारा देण्यापर्यंत हा संघर्ष पोहोचला होता. याचा परिणाम म्हणून की काय दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीचे रणमैदानही चांगलेच गाजले होते. एकमेकावर अगदी वैयक्तिक पातळीवरून टीकाटिप्पणी झाली होती.

सांगली लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकत एकमेकांवर जहरी टीका केलेल्या भाजपच्या दोन नेत्यांमध्ये अखेर मनोमिलन झाले. खासदार-आमदारामध्ये झालेले मनोमिलन सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. आटपाडीमध्ये खासदार संजयकाका पाटील यांचे खंदे समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे मित्र अनिल पाटील यांनी पडळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात या दोन नेत्यांना एकत्र आणून दोन्ही नेत्यांनी दोघांमधील वादाला तिलांजली देत असल्याचे दाखवून दिले. या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याने जिल्ह्यातील भाजप नेत्यांमधील अंतर्गत वाद थांबण्यास आणि गटा-तटात कार्यकर्त्यांची होणारी विभागणी थांबण्यास मदत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत हे दोघेजण एकमेकांविरोधात उभे होते. संजयकाका पाटील भाजपकडून तर गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडी लोकसभा लढवली होती. निवडणूक निवडणूक प्रचारात तर दोघांनी एकमेकांवर जहरी टीका देखील केली होती. पण हा सगळा भूतकाळ विसरून हे दोन नेते एकत्र आल्याने दोन्ही गटातील कार्यकर्ते मात्र सुखावले आहेत. सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोघे एक दिलाने काम करणार असल्याची ग्वाही खासदार व आमदार यांनी दिली. आमच्यात मतभेद होते, मात्र कधीही मनभेद नव्हते असे सांगत एका विचाराने जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याची भूमिका दोघा नेत्यांनी घेतली.

दोघांमध्ये असलेला संघर्ष कसा मिटला हेही या निमित्ताने पाहणे औत्सुक्याचे ठरते. आटपाडीचे अनिल पाटील यांनी खासदारांशी सलोखा करण्याची तयारी आमदार पडळकर यांनी करावी अशी गळ घातली. पडळकरांनीही ती मान्य केली. यासाठी खासदारांशी बोलणी करण्याची तयारी पाटील यांनी विटय़ाचे शंकरनाना मोहिते यांनीही प्रयत्न केले. टेंभू योजनेचे पाणी आटपाडीच्या दुष्काळी भागात आता आले आहे. या पाण्यामुळे आर्थिक सुबत्तेचे स्वप्न दिसू लागले आहे. मात्र, आजही माणदेश औद्योगिक विकासात मागासलेला आहे. राजकीय संघर्षांमुळे गुणवत्ता, कष्टाची तयारी असूनही या भागातील तरूण मुंबईच्या गोदीमध्ये अथवा गलाई व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेला आहे. तर दरवर्षी शेळय़ामेंढया घेऊन फिरस्ती कायमचीच लागलेली आहे. या मुशाफिरीला आता आळा बसण्याचे दिवस समोर येत असताना राजकीय संघर्ष या भागाला परवडणारा नाही हे काळाची पावले ओळखून एकत्र येण्याचा दोन्ही नेत्यांचा मनसुबा निश्चितच भविष्याच्यादृष्टीने लाभदायी ठरणारा आहे.

राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो आ. पडळकर हे एक चांगले नेतृत्व असून आम्ही दोघे एकत्र येऊन केंद्र व राज्य शासनाचा निधी आटपाडी तालुययासह सांगली जिल्ह्यामध्ये आणून विकासातून राजकीय मैत्री वाढवत राहू असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले, तर, आटपाडी तालुक्यातील इंच ना इंच जमीन टेंभू योजनेच्या पाण्याखाली आणण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील राहणार आहोत असे आमदारांनी सांगितले.

दोन नेत्यांमधील राजकीय संघर्ष केवळ विकासाला बाधा आणणाराच नव्हे तर गावपातळीवरील कार्यकर्त्यांना नाऊमेद करणारा ठरतो. एकाच पक्षात असूनही हा संघर्ष का संपत नाही या विचारातून आमदार पडळकर आणि खासदार संजयकाका पाटील यांच्याशी स्वतंत्रपणे बोलणी करून ही मनोमिलन घडविले. आता  दुष्काळी भागाच्या विकासाचा अनुशेष भरून निघण्यास मदत होईल.

– अनिलशेठ पाटील, आटपाडी.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relief for bjp in sangli mp mla election mla gopichand padalkar political ysh
First published on: 07-10-2022 at 00:02 IST