गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांवर प्राप्तिकर विभागाच्या नोटीस येत होत्या. यासंदर्भात परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना दिलासा दिल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह, सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांना अधिक पेमेंट झाल्यास प्राप्तीकराच्या नोटीसेस त्यांना प्राप्त होत होत्या. मात्र, आता तसे होणार नाही, एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता साखर कारखान्यांना २०१६ नंतरचा आयकर लागणार नाही. हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्दल आणि त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केल्याबद्दल आज नवी दिल्ली येथे देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि या निर्णयाबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शेतकर्‍यांना अधिक दर दिल्याने कारखान्यांना नोटीसे येत होत्या. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा केसेस प्रलंबित होत्या. यासंदर्भात गेल्या आठवड्यात एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ते दर देताना सक्षम प्राधीकरणांच्या मान्यता घेण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक कारखान्यांना नोटीस आल्या होत्या. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मोदी सरकार किती गतिमान निर्णय घेते, याचा पुन्हा परिचय आला आणि अवघ्या आठवड्याभरात हा निर्णय झाला. २०१६ नंतरचे कर आता रद्द केले आहेत. त्यापूर्वीच्या कराबाबत निर्णय करण्यासाठी संसदेची मान्यता घ्यावी लागणार आहे, ती सुद्धा प्रक्रिया यथावकाश होईल. यातून शेतकर्‍यांचा सुद्धा मोठा फायदा होणार आहे”, असे फडणवीस म्हणाले.