बंद पडलेले साखर कारखाने सुरू होणं शेतकरी आणि कामगार यांच्या हिताचे आहे. यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी इस्लामपूर येथे बोलताना व्यक्त केले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे साखर कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात खा. पवार बोलत होते. यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह आ. मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, अरूण लाड कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष या नात्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना खा. पवार म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीपुढे गैरव्यवस्थापनामुळे अडचणी वाढल्या.मात्र, सतत कारखाने बंद राहू लागले तर यंत्रसामग्रही गंजून खराब होते. कारखाने बंद पडणे हे शेतकर्यांना व साखर उद्योगाला परवडणारे नाही. यावर आता गांभीर्याने विचार करायला हवा. कारखाने बंद पडले की जिल्हा बँकांवर याचा बोजा येतो. परिणामी जिल्हा बँकेचा एनपीए वाढतो. मुंबईत सामुहिक रोजगार देणार्या जशा गिरण्या होत्या, तीच स्थिती साखर कारखानदारीची आहे. मात्र, गिरण्या बंद पडल्याने कामगारांचे हाल झाले. अनेकांचे रोजगार गेले. अशी स्थिती साखर कारखान्यांची व्हायला नको. तांत्रिक कामगाराची उणीव भासत असल्याचे लक्षात आल्यावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने कामगारांना प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेतले. सांगलीतील वसंतदादा कारखान्याची अवस्था पाहिली तर अस्वस्थ होते. कारण एकेकाळी साखर कारखानदारीसमोर वसंतदादा कारखान्याचा आदर्श होता. आज हा कारखाना काही खासगी लोकांच्या ताब्यात गेला आहे. ही वेळ का आली याचा विचार करायला हवा. कारखाना बंद पडला तर त्याचा परिणाम कामगाराबरोबरच शेतकर्यांवरही होतो. आज बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी काही तरी उपाय शोधण्याची गरज आहे. सहकार व कामगार मंत्री यांनी याबाबत पुढाकार घेउन याबाबत काही निर्णय घ्यायचा तर कसा घ्यावा याचा विचार करावा असेही खा. पवार म्हणाले.