रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील खानू गावाजवळ एक भरधाव झायलो कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्वजण मुंबईतील रहिवासी असल्याचे समजते.
आज (बुधवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त कार गोव्याच्या दिशेने भरधाव चालली होती. या कारमध्ये आठजण होते. हा अपघात इतका भयंकर होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना बाहेर काढले. मात्र, कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अभिषेक कांबळे (२३) हा तरुण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मृतांमध्ये वैभव मनवे (३२), केदार तोडकर (२६), सचिन विश्वनाथ सावंत (३१), प्रशांत जगन्नाथ गुरव (३१), अक्षय शंकर केळकर (२४), मयुर बेळणेकर(२८), निहाल कोटियन (२२) यांचा समावेश आहे.