Rohit Pawar : राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या संपूर्ण निवडणुकीत राज्यातील काही नगरपरिषदेच्या निवडणुका चांगल्याच चर्चेत राहिल्या. त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आता जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. जामखेड नगरपरिषदेत भाजपाचा दणदणीत विजय झाला आहे.

जामखेड नगरपरिषदेत झालेल्या पराभवानंतर आमदार रोहित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रोहित पवार यांनी या पराभवाचं खापर जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या काही नेत्यांवरही फोडलं आहे. संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवली तरी लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर यापुढे विश्वास कसा ठेवायचा, हा प्रश्नच असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांनी काय म्हटलं?

“जनतेने दोनदा मतांचं दान भरभरुन पदरात टाकलं, त्यांच्या मी कायम ऋणात राहील, पण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली तरी आज लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. जनतेवर आक्षेप नाही पण सगळीकडे पैसाच चालत असेल तर बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि इतर अशा राजकीय दृष्टीकोनातून दुर्लक्षित आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना न्याय कधी मिळणार हा प्रश्नच आहे.”

“आज तत्व आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी आणि पैशांनी गढूळ झालेलंच अधिक दिसतं, म्हणूनच आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले तर चारचौघात त्या धंद्यांचं नाव घेण्याचीही लाज वाटते… मग अशा परिस्थितीत डोक्यात विचारांचं काहूर उठल्याशिवाय राहत नाही! महत्त्वाचं म्हणजे काही अपक्षांनी तसंच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपाची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकंही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळं यापुढं काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, हाही प्रश्नच आहे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.