शिवसेनेत फूट पडून राज्यात सत्तारांनतर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असेला शिवसेनाच दसरा मेळावा अखेर काल झाला. शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा होता, तर न्यायालयीन लढाई जिंकत उद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेतला. या दोन्ही दसरा मेळाव्याकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी जोरदार टीका, टिप्पणी पाहायला मिळाली. आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवाय, आपला दसरा मेळावा हा अधिक भव्य झाला पाहिजे, यासाठी दोन्ही गटांकडून मोठी ताकदही लावण्यात आली होती.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काल वांद्रे-कुर्ला संकुलामधील एमएमआरडीच्या मैदानावर भाषण सुरू असताना, सभेसाठी जमलेला जमाव हळूहळू सभास्थळावरुन काढता पाय घेत असल्याचं चित्र दिसून आलं. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाकडून आपल्या पहिल्या दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली गेली होती. राज्यभरातून लोकांना आणण्यासाठी चोख व्यवस्थाही करण्यात आली होती. यासाठी मोठ्याप्रमाणावर पैसा खर्च झाल्याचेही समोर आले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी न्यायालयीन लढाई जिंकत पारंपारिक पद्धतीने शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेतला. या दसरा मेळाव्याला मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीटद्वारे शिंदे गटाला टोला लगावल्याचे दिसत आहे.

आमदार रोहित पवार म्हणतात “कालच्या दोन्ही सभा बघितल्या, लोकांमध्ये उत्साह-निष्ठा बळजबरीने किंवा अन्य मार्गांनी आणता येत नाही, माणसं स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते हेच पुन्हा अधोरेखित झालं.”

याचबरोबर “ मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखाद-दुसरा बुरुज ढासळू शकतो ,परंतु सामान्य कार्यकर्ते , जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली.” असं म्हणत त्यांनी नावाचा उल्लेख न करता शिंदे गटावर निशाणाही साधला.

Dasara Melava: मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरु असतानाच BKC मैदानातील लोक उठून निघून गेले; रिकाम्या खुर्च्यांचे Video Viral

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये प्रामुख्याने ठाकरे कुटुंबाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण जवळजवळ दीड तास सुरु होते. रात्री साडेआठच्या आसपास मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि ते दहा वाजेपर्यंत बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या या लांबलेल्या भाषणादरम्यान बीकेसीच्या मैदानामध्ये सभेसाठी जमलेला जमाव हळूहळू सभास्थळावरुन काढता पाय घेत असल्याचं चित्र दिसून आलं.