राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी झुंडबळींच्या घटनांवर नाराजी व्यक्त केली होती. गझियाबादमध्ये ‘हिंदुस्थान फर्स्ट हिंदुस्थानी बेस्ट’ या कार्यक्रमात भागवत यांनी झुंडबळींमध्ये सहभाग असलेले हिंदुत्वविरोधी आहेत, असे मत मांडलं. भागवत यांनी मांडलेल्या भूमिकेचा हवाला देत शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. “घरात ‘बीफ’ आढळले म्हणून गेल्या सात वर्षांत अनेकांना झुंडशाहीचे बळी व्हावे लागले. पण जेथे हिंदुत्ववाद्यांची सरकारे आहेत अशा अनेक राज्यांत गायींचे मांस विकले जात आहे,” असं सांगत शिवसेनेनं भाजपाच्या भूमिकेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केलं.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दल मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. “सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ एकच असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालकांनी पुढे असेही सांगितले की, भारतात मुस्लिम व्यक्ती राहू शकत नाही असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही. त्यावर आता राष्ट्रीय चर्चा व्हायला हरकत नाही. मुळात असे काय घडले की, सरसंघचालकांना मुसलमानांना त्यांच्या ‘डीएनए’ची आठवण करून द्यावी लागली. गेल्या पाच-सहा वर्षांत देशाचे वातावरण अतिफाजील, उन्मादी लोकांच्या हाती गेले. निवडणूक राज्याची असो नाहीतर देशाची, दंगली, उन्माद, धार्मिक फाळणी, धर्मद्वेष हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा अजेंडा राहिला. पण हा ‘उन्माद’ प. बंगालात अजिबात चालला नाही. हिंदुत्वाची आग पेटवूनही प. बंगालातील हिंदू समाजाने भाजपाला साथ दिली नाही. बंगाली अस्मितेच्या मुद्द्यांवर तेथील हिंदू ममता बॅनर्जी यांच्याच मागे ठामपणे उभा राहिला. प. बंगालात दुर्गापूजा, हिंदुत्व खतरे में, ईश्वरचंद्र विद्यासागर विद्यापीठावरील हल्ले असे सर्व घडूनही भाजपाला हिंदू-मुसलमानांत विभाजन करून निवडणुका जिंकता आल्या नाहीत. उलट या सर्व उपद्व्यापांमुळे हिंदूंची पीछेहाट झाली. केरळातही भाजपास्टाईल हिंदुत्व लोकांनी स्वीकारले नाही. तेथेही पराभव झाला,” असं मत शिवसेनेनं नोंदवलं आहे.

हेही वाचा- भारतात मुस्लीम व्यक्ती राहू शकत नाही असं एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही – मोहन भागवत

“उत्तर प्रदेशात वातावरण झपाट्याने बदलताना दिसत आहे. लोकांना आता उन्मादाचे, धर्मद्वेषी राजकारण नको आहे. हे सरसंघचालकांनी मान्य केले असले तरी त्यांचे राजकीय अंग असलेल्या भारतीय जनता पक्षाने हे स्वीकारले आहे काय? सरसंघचालकांनी आता देशातील मुसलमान समाजालाच हाक दिली आहे. भागवत म्हणतात, ”भारतात इस्लाम धोक्यात आहे, या भीतीच्या जाळ्यात अडकू नका. कारण धर्म कुठलाही असला, तरी सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष होण्याचे कारण विसंवाद आहे. मुळात हिंदू-मुस्लिम ऐक्य ही संकल्पनाच दिशाभूल करणारी आहे. कारण हिंदू आणि मुसलमान हे एकच आहेत,” असे सरसंघचालक म्हणतात. भारतासारख्या लोकशाही देशात हिंदू किंवा मुसलमान कुणाचाही वरचष्मा असू शकत नाही. वरचष्मा असेलच तर तो भारतीयांचा असेल, असे भागवत म्हणतात; पण सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना हे पटेल काय?,” असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

हेही वाचा- ही हिंदुत्वाचीच देण; सरसंघचालक भागवत यांना असदुद्दीन ओवेसींचं प्रत्युत्तर

“गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या नावावर जे झुंडबळी देशभरात गेले, त्यावर सरसंघचालकांनी नाराजी व्यक्त केली. असे झुंडबळी हिंदुत्व संकल्पनेत बसत नाहीत असे ते म्हणतात व राष्ट्रीय ऐक्य हेच देशाला विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाईल, असे स्पष्ट करतात. भागवत यांनी मांडलेले विचार झटकून टाकता येणार नाहीत. उन्मादी पद्धतीने राज्य चालविणाऱ्यांचे कान सरसंघचालकांनी टोचले आहेत. एखादी व्यक्ती कोणती प्रार्थना करीत आहे यावरून त्याला वेगळे ठरवता येणार नाही, असेही भागवत सांगतात. तेव्हा एखादी व्यक्ती काय खाते व पिते यावरूनही त्याला वेगळे ठरवता येणार नाही. गायीला देवता मानणे हा आपला धार्मिक आचार आहेच. त्या गोमांस भक्षणावरून राजकीय वातावरण तापवले गेले. घरात ‘बीफ’ आढळले म्हणून गेल्या सात वर्षांत अनेकांना झुंडशाहीचे बळी व्हावे लागले. पण जेथे हिंदुत्ववाद्यांची सरकारे आहेत अशा अनेक राज्यांत गायींचे मांस विकले जात आहे व सरकारच्या तिजोरीत त्यातून मोठी कमाई होत आहे. एका बाजूला गोमांस विक्रीवरून, प्रार्थना पद्धतीवरून झुंडबळी आणि दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात गोमांस विक्री हे ढोंग आहे. सरसंघचालकांनी याच विसंगतीवर हल्ला केला आहे,” अशी टीका शिवसेनेनं भाजपावर केली.

हेही वाचा- …तर मुस्लिमांचा छळ करणाऱ्या भाजप नेत्यांना पदावरून हटवा!; दिग्विजयसिंह यांचे सरसंघचालकांना आवाहन

“येथील मुसलमान हे बाबराचे किंवा चंगेज खानाचे वंशज नाहीत. त्यांचा ‘डीएनए’ इथलाच आहे, असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेसुद्धा सांगत होते. आमचा मक्का-मदिना याच मातीत असायला हवा. मक्केत बांग दिली तर येथील धर्मांध मुसलमान जागा होतो. फ्रान्स किंवा इतर देशांत कुठे इस्लाम खतऱ्यात आला की, येथील धर्मांध मुसलमान ‘इस्लाम खतरे में’चे नारे देत रस्त्यावर उतरतात. यामुळे राष्ट्र आणि राष्ट्रीय ऐक्य खतऱ्यात येते. आतापर्यंत काय घडले? या देशातील सरकारचे धोरण व सत्ताधाऱ्यांची मतांसाठी होणारी लाचारी यामुळेच देशात हिंदू-मुसलमानांचे झगडे किंवा दंगली होत राहिल्या. अर्थात पाकिस्तानवर प्रेम करून कोण राहू पाहत असेल तर त्यांना विरोध होणारच. बांगलादेशी व रोहिंगे मुसलमान आपले कोणी लागत नाहीत. सरसकट सगळे मुसलमान देशद्रोही असे शिवसेनेने कधीच म्हटले नाही. देशप्रेम व राष्ट्रवादाचा आदर्श म्हणून पूर्वी व आताही असंख्य मुसलमानांकडे प्रेरणादायी म्हणून पाहावेच लागेल. पण काही कोपरे पाकिस्तानप्रेमाने अगदी कडवटपणे उभे राहतात आणि तेच झगड्यांना आमंत्रण देतात. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मार्गी लावला व देशातील मुसलमान त्याप्रश्नी संयमानेच वागले. तिहेरी तलाकपद्धती रद्द करण्यावर मुस्लिम समाजातील महिलांनी स्वागत केले. समान नागरी कायदा असेल किंवा लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण, मुसलमान समाजाने ‘भारतीय’ म्हणून या धोरणांचा स्वीकार केला पाहिजे. मुसलमान हे या देशाचे दुय्यम दर्जाचे नागरिक नाहीत असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गर्वाने सांगितले. फक्त त्यांनी स्वतःला भारतीय मानावे असे भागवत यांचे मागणे आहे. हिंदू हा सहिष्णू, तितकाच विनम्र आहे. त्याने आक्रमणकारी मोगलांचा प्रतिकारही सहनशीलतेनेच केला. मोगल आक्रमक होते म्हणून हिंदूंनी त्यावर तलवार चालवली. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हे राष्ट्रीयत्वच होते. भागवत यांनी त्याचाच पुरस्कार केला आहे. धर्माच्या नावावर अतिरेकी झुंडशाही व झुंडबळी म्हणजे विकासाला खोडा आहे. ते थांबवा! सरसंघचालकांना हे विचार मांडावे लागले. त्यामागे काही विशेष संदेश आहे काय?,” असं प्रश्नही शिवसेनेनं केला आहे.