रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्दामुळे भारतात रासायनिक खातांच्या तुटड्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामासाठी मार्च महिना अखेर पर्यंत खत खरेदी करून ठेवावीत. असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. रशिया-युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. त्यामुळे रशियातून होणारी खताची निर्यात ठप्प झाली आहे. याचा परिणाम भारतातील खत पुरवठ्यावर होण्याची दाट शक्यता आहे. रशियातून जगभरात रासायनिक खतांची निर्यात केली जाते. युध्द सुरु राहील्यास खत पुरवठा पूर्ण बंद केला जाईल असे रशियाने यापुर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे या युध्द परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय खत पुरवठ्यावर परिणाम होईल असा अंदाज कृषी तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. रायगड जिल्ह्यात प्रमुख्याने खरीप हंगामात भाताचे पिक घेतले जाते. १ लाख ४० हजार क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. त्यासाठी खतांची गरज भासते. जिल्ह्यात सध्या युरिया ४५५.५१ मेट्रिक टन, डीएपी २९.२५ मेट्रीक टन, एमओपी ३७.२८, एनपीकेएस ३६०, एसएसपी ३५६.९५, कम्पोस्ट १५. १० असे एकूण १ हजार २५४ मेट्रिक टन रासायनिक खत खरेदीसाठी उपलब्ध आहेत. “युध्दामुळे खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्याता आहे. ऐनवेळी खत खरेदी करण्यासाठी गेल्यास बाजारात खत उपलब्ध नसेल. त्यामुळे शेतकर्यांनी मार्च महिन्यातच खतं खेरेदी करावीत.” असे आवाहन रायगडचे कृषी उपसंचालक, डी.एस.काळभोर यांनी केले आहे.