काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये बोलताना खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारच्या भूमिकेवर परखड टीका केली होती. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पाठवलेलं पत्र आपल्याला मान्य नाही, असं म्हणत संभाजीराजे यांनी पत्रातील मुद्द्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. “राज्य सरकारने पाठवलेलं पत्र अधिकाऱ्यांनी लिहून पाठवलंय. फक्त पाठवायचं म्हणून हे लेखी उत्तर पाठवलंय. मुख्यमंत्र्यांनी देखील याची पुरेशी दखल घेतली नाही”, अशा शब्दांत संभाजी राजे यांनी आपला संताप व्यक्त केला.

न सांगता इतकी गर्दी जमली, सांगून बघू का?

संभाजीराजे यांनी नांदेडमध्ये घेतलेल्या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न त्यावेळी संभाजीराजे यांनी केल्याचं दृश्यांमध्ये दिसून आलं होतं. त्याचा संदर्भ घेत संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. “आवाज उठवायचा म्हटला, तर मी करू शकतो. आम्ही न बोलवता किंवा सांगता देखील नांदेडला ५० ते ७० हजार लोक हजर होते. रायगडसारख्या ठिकाणी आम्ही सुरुवात करू. जर सरकार दखल घेत नसेल आणि आम्ही करायचंच असेल तर करू शकतो. नांदेड ही फक्त एक झलक होती. तीही न सांगता. सांगून बघू का? मग बघा”, असं संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.

“आमची परीक्षा घेऊ नका”

दरम्यान, “आमची परीक्षा घेऊ नका. सरकारनं ठरवावं, तेव्हा बैठकीला बसायची आमची तयारी आहे. पण सरकारची तयारी नसेल, तर रायगडावर बसून आमची मूक आंदोलनाची तयारी आहे. मग नांदेडला जशी गर्दी जमली, तशी गर्दी जमली तर मी जबाबदार राहणार नाही. हे चालेल का सरकारला?” असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे. दरम्यान, यावेळी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी आपण समाजाला वेठीला न धरता एकटे आंदोलन करू, ज्यामुळे करोनामध्ये होणारी गर्दी टाळता येईल, असं देखील नमूद केलं.

“हे अधिकारी लोक एवढे फसवतात…”

“आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीत म्हटलंय की १८८५ कोटी रुपयांचा निधी वाटला. हे अधिकारी लोकं एवढे फसवतात. हे पैसे सरकारने दिलेले नसून बँकांनी दिलेले आहेत. हे मागच्या सरकारने केलेलं आहे. तुम्ही किती दिले हे अधिकाऱ्यांनी सांगावं. आत्ता जाहीर केले साडेबारा कोटी रुपये. जे पूर्वीच्या सरकारने केलं, त्यापुढे आत्ताच्या सरकारने काहीही केलेलं नाही”, असं देखील संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.