छत्रपती संभाजीनगर राडा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला आणि संभाजीनगरबाबत महत्त्वाचं आवानहन केलं.

Chief Minister Eknath Shinde made an important appeal
जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

छत्रपती संभाजी नगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री राडा झाला. त्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका हेदेखील सांगितलं जातं आहे. मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनांच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

काय म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी?

“छत्रपती संभाजीनगरमधली परिस्थिती नियंत्रणात आहे. आपण सगळ्यांनी शांतता राखली पाहिजे. रामनवमीचा उत्सव आहे. आपल्या राज्यात सर्वधर्मीय सर्व सण एकत्र येऊन साजरे करतात. त्यामुळे सर्वधर्मीयांना माझी विनंती आणि आवाहन आहे की इतके वर्षे आपण सण आनंदाने साजरे करतो. आत्ताही शांतता राखा आणि उत्सव साजरे करा. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिल यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं.” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

काय घडलं छत्रपती संभाजीनगरमध्ये?

संभाजीनगरमध्ये रात्री दोनच्या सुमारास किराडपुरा भागातील राम मंदिराजवळ दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. किराडपुरा भागातील राममंदिराजवळ काही तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हा प्रकार घडला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.मात्र आता राज्यभरात यावरून आता राज्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. काही लोकांकडून भडकाऊ भाषण देऊन परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत काय बोलावं, याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. सर्वांनी शांतता राखायला हवी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या घटनेला कोणी राजकीय रंग देत असतील तर यापेक्षा जास्त दुर्दैवी काहीही नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 14:45 IST
Next Story
“इम्तियाज जलील यांच्यामुळे दंगल झाली”, कराड-खैरेंच्या आरोपांना जलील यांचं उत्तर म्हणाले, “मी स्वतः…”
Exit mobile version