सनातन संस्थेची बदनामी केल्याबद्दल काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात बदनामीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. तर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वीज प्रकल्पाची २ हजार कोटीची वसुली व्हावी यासाठी जनहित याचिका दाखल केली जाणार आहे, अशी माहिती िहदू विधिज्ञ परिषदेचे अ‍ॅड.संजीव पुनाळकर व अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. सनातन विषयी चुकीचे वृत्त प्रसिध्द करणाऱ्या वृत्तवाहिन्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सनातन संस्थेबाबत बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात सनातन संस्थेच्या वतीने शाहू स्मारक येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले, विखे यांच्या प्रवरा सहकारी वीज निर्मिती प्रकल्पामध्ये २ हजार कोटी रुपये राज्य शासनाचे बुडाले असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. सध्या राज्यात दुष्काळ असून मदतीसाठी सिध्दीविनायक मंदिराच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याला १ कोटी रुपये याप्रमाणे ३४ कोटी रुपये दिले आहेत. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आणखी निधीची गरज असल्याने विखे यांच्याकडून रक्कम वसूल व्हावी यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे.
मडगांव बॉम्बस्फोटातील रुद्र पाटील याच्याबाबत ते म्हणाले, तो सध्या फरार घोषित केला आहे. तो आमच्या संपर्कात नाही. संपर्कात आल्यास त्याला पोलिसात हजर राहण्यासाठी प्रयत्न केले जातील.
समीर गायकवाड हा सनातनचा पूर्ण वेळ कार्यकर्ता असल्याने त्याच्यासाठी ३० वकील मदतीसाठी उतरले होते. रुद्र पाटील, प्रवीण लिमकर यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. ‘हु किल्ड करकरे’ या पुस्तकाचे लेखक, निवृत्त पोलीस महासंचालक शमशुद्दीन मुश्रीफ हे सनातन संस्था व िहदुत्वाविषयी द्वेष भावनेने बोलत असतात, असा उल्लेख करुन पुनाळकर म्हणाले, समाजामध्ये बुध्दिभेद पसरविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते द्वेषमूलक विधाने करत राहिल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही.
सनातन संस्थेच्या साधकांचा बॉम्बस्फोटामध्ये सहभाग असल्याची ओरड पुरोगाम्यांकडून केली जाते. मात्र, अंनिसचे विदर्भातील जिल्हाध्यक्ष नरेश बनसुडे यांचा नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याचे आढळून आल्यावर हेच पुरोगामी मूग गिळून का गप्प बसतात, असा सवाल इचलकरंजीकर यांनी केला.