शिवसेनेत आजपर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी ५० आमदारांसह भाजपासोबत हातमिळवणी केली. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. तर, दुसरीकडे शिवसेनेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील अॅक्टिव्ह झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी औरंगाबादच्या पैठणमध्ये एका सभेत बोलताना मोठा दावा केला आहे. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पैठणमध्ये एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पैठणमध्ये आले होते. मात्र, त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये असलेल्या रिकाम्या खुर्च्यांची शनिवारी दिवसभर चर्चा सुरू होती. बंडखोरांना जनतेनं नाकारल्याचं देखील बोललं जात होतं. मात्र, या सभेत संदीपान भुमरेंनी भाषणात केलेल्या दाव्याची त्याहून जास्त चर्चा होऊ लागली आहे. उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार संपर्कात असल्याचं भुमरे म्हणाले आहेत. भुमरेंनी सांगितला 'तो' किस्सा यावेळी बोलताना संदीपान भुमरे यांनी उपस्थितांना घडलेला किस्सा सांगितला आहे. "त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) जे काही १०-१२ आमदार आहेत, त्यातले परवाच एक मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले. ते म्हणाले कसं करू साहेब.. मी म्हटलं काही हरकत नाही, या इकडे", असं भुमरे यावेळी म्हणाले. दरम्यान, संदीपान भुमरेंच्या दाव्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं असून खरंच शिवसेनेतून अजून काही आमदार फुटणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.