सांगली : शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी अन्य पिकांबरोबरच शाश्वत व हमखास उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा पर्याय अवलंबणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी, वन, सामाजिक वनीकरण यांसह सर्व संबंधित यंत्रणा शेतकऱ्यांना आवश्यक ते साहाय्य व सर्वोतपरी मार्गदर्शन करतील, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.माणगंगा उद्योग समूह आटपाडी यांच्या विद्यमाने आटपाडी येथील जवळे मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय बांबू लागवड व बांबू मिशन कार्यशाळेत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली.पालकमंत्री म्हणाले, बांबूला एकविसाव्या शतकातील हिरवे सोने म्हणले जात आहे. सध्याच्या बाजारापेठेनुसार या उत्पादनाला जागेवर टनाला तीन ते साडेतीन हजार रुपये दर मिळत आहे. एकदा लागवड केल्यावर पुढे ८० ते १०० वर्षे उत्पादन घेता येते. बांबूपासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती केली जाते. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा या पिकाकडे निश्चित कल वाढेल. बांबूच्या रूपाने एक चांगले पीक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. सध्या बांबू लागवडीसाठी मिळणारे अनुदान दोन हेक्टर क्षेत्रावरील लागवडीसाठीच असून क्षेत्राचे बंधन काढण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.उपवनसंरक्षक विजय माने म्हणाले, बांबू लागवडीमध्ये रोजगारनिर्मितीची फार मोठी क्षमता आहे. बांबू लागवडीसाठी गावानुसार बांबूची प्रजाती निवडता येते. चार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर बांबू लागवड करणाऱ्यांना ८० टक्के सबसिडीने व गुणवत्तापूर्ण रोपे मिळतील.या वेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, कृषी अधीक्षक मनोजकुमार वेताळ, समाजिक वनीकरण विभागाचे विलास काळे यांनीही बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन केले.