सांगली : पोहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी आष्ट्याजवळ घडली.
वाळवा तालुक्यातील आष्टा खोतवाडी येथील केरबा धोंडीराम बागडी (वय २७) आणि अजय पप्पन बागडी (वय १९, दोघेही रा. नागाव रोड झोपडपट्टी आष्टा) हे पोहण्यासाठी विहिरीत उतरले होते. दोघेही बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याने ही माहिती पोलिसांना कळवली. सांगलीतील बचाव पथकाकडून विहिरीत शोध घेतला असता दोघांचे मृतदेह विहिरीच्या तळाला आढळले.
पथकानी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. विहीर साठ फूट खोल असून त्यात ४० फूट पाणी आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.