शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना उद्धव ठाकरेंनी हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. युती असती तर एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री असते असा दावा संजय राऊतांनी केला आहे.  

“एकनाथ शिंदे व चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटन ठाम असते. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. ते नक्कीच झाले असते, पण त्यांचे मुख्यमंत्रीपद कोणी रोखले? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे,” अशी टीका सामना रोखठोकमधून करण्यात आली आहे.

“शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. ते आधी सुरतला जाऊन राहिले. नंतर गुवाहाटीला पोहोचले. या सगळ्यांचे नेतृत्व शिंदे करीत असले तरी या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपाचे दिग्दर्शक आहेत, हे शिंदे यांनीच उघड केले. भाजपाची महाशक्ती आपल्या पाठीशी आहे अशी कबुलीच त्यांनी दिली. सुरतमधील ‘मेरिडियन’ हॉटेलात शिवसेनेच्या आमदारांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील भाजपाचे लोक उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपाचे सरकार आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा ‘फुटीर’ आमदारांच्या सरबराईसाठी वापरण्यात आली. सुरतवरून हे बिऱ्हाड खास विमानाने आसामची राजधानी गुवाहाटी येथे हलवण्यात आले. आसामच्या भाजपा सरकारने या बिऱ्हाडाची सर्व व्यवस्था केली. या सर्व प्रकरणाशी जर भाजपाचा संबंध नव्हता, हा शिवसेनेचा अंतर्गत मामला होता, तर मग या बिऱ्हाडाची इतकी कडेकोट व्यवस्था करण्याचे कारण काय? दुसरे महत्त्वाचे, बिऱ्हाड गुवाहाटीत पोहोचल्यावर काही आमदार मुंबईतून निघाले ते थेट गुवाहाटीला न जाता आधी सुरतला गेले. तिथून गुवाहाटीला गेले. ते रहस्य काय? सुरतच्या भूमीवर असा कोणता मंत्र या आमदारांना देण्यात आला? जे आमदार नंतर गुवाहाटीला गेले, त्यांनाही ‘व्हाया’ सुरत जावे लागले. हा संशोधनाचा विषय आहे,” असा सवाल सामना रोखठोकमधून विचारण्यात आला आहे.

“एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध उघड बंड केले व त्यांना शिवसेनेच्या चाळीस आमदारांचे समर्थन मिळाले. नारायण राणे व छगन भुजबळ यांनाही त्यांच्या बंडात आमदारांचे इतके समर्थन मिळाले नव्हते. छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला तेव्हा शिवसेना सत्तेवर नव्हती, पण ग्रामीण भागात शिवसेना फोफावत होती. भुजबळांचे बंड हे मनोहर जोशींविरुद्ध होते व भुजबळांना मोठ्या प्रमाणात लोकांची सहानुभूती असूनही स्वतः भुजबळ माझगाव विधानसभेत निवडणूक हरले व त्यांच्याबरोबर गेलेल्या बहुतेक सर्व आमदारांचा निवडणुकीत पराभव झाला. अनेकांची राजकीय कारकीर्दच संपली. नारायण राणे यांनी बंड केले तेव्हा त्यांच्या सोबतही दहाच्या वर आमदार नव्हते. राणे यांचे कोकणात त्यावेळी महत्त्वाचे स्थान होते. राणे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात पोटनिवडणुका झाल्या. त्यात काही लोक जिंकले, पण नंतरच्या मध्यावधी निवडणुकीत राणे यांच्यासह त्यांच्या बरोबर गेलेले बहुतेक सर्वच आमदार कोकणात पराभूत झाले व त्यांची कारकीर्दच कायमची संपली. शिवसेनेतून जे बाहेर पडले, त्यांना राजकारणात उभे राहणे कठीण झाले. त्यामुळे आज जे चाळीस आमदार सुरत, गुवाहाटी, गोवा असे पर्यटन करीत आहेत, त्यांचे राजकीय भवितव्यच पणाला लागले. बंडात सहभागी झालेला मराठवाड्यातला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही हे पहिले व त्याआधीच त्यांच्या आमदारकीवर अपात्रतेची तलवार पडू शकेल असे कायदा सांगतो हे दुसरे. विधिमंडळ पक्षात फूट पडली. म्हणून स्वतंत्र गट स्थापन करून राजकारण करता येणार नाही. विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणजे मूळ पक्ष फुटला असे नाही. पक्षात फूट पडणे व विधिमंडळात फूट पडणे या दोन भिन्न बाबी आहेत. शिवसेना हा पक्ष एकसंध आहे हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले,” असे सामना रोखठोकमध्ये म्हटले आहे.

“शिंदे हे शिवसेनेतील अलीकडच्या काळातील महत्त्वाचे नेते होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शिंदे यांना फडणवीस काळात व ठाकरे सरकारात महत्त्वाची खाती दिली. नगरविकास खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. उद्धव ठाकरे यांनी ते शिंदेंकडे सोपवले. या खात्याचा पसारा व आर्थिक उलाढाल मोठी आहे. मुख्यमंत्री करण्याबाबत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचा शब्द होता असे सांगितले जाते. त्यातून हे बंड झाले. मुख्यमंत्री पदाबाबत शब्द असू शकतो, पण भारतीय जनता पक्षाबरोबर झालेला ‘अडीच वर्षे’ मुख्यमंत्रीपदाचा करार भाजपाने मोडला. हा करार पार पडला असता तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते हे नक्कीच. उद्धव ठाकरे यांनी त्यांचेच नाव पुढे केले असते. शिंदे यांचा घात भाजपाने केला. त्याच भाजपबरोबर शिंदे व त्यांच्या बरोबरच्या आमदारांना आता जायचे आहे. हे आश्चर्य आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले ते नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीची गरज म्हणून. स्वतः शरद पवार व सोनिया गांधी यांनी त्यांना आग्रह केला व मुख्यमंत्रीपदी बसवले, पण शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हुकले ते फक्त भाजपाने शब्द फिरवल्यामुळेच. तोच भाजपा त्यांना महाशक्ती वाटत आहे,” असा टोला रोखठोकमधून लगावण्यात आला आहे.

“शिवसेनेतून आज जे आमदार बाहेर पडले, त्यातले काही आमदार मूळ शिवसेनेचे नाहीत. अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व महाविकास आघाडीमुळे धोक्यात आले? दीपक केसरकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करीत शिवसेनेत आले व मंत्रीही झाले. त्यांनी भाजपा व हिंदुत्वाच्या गप्पा मारत सुरतमार्गे गुवाहाटी गाठावी हे गमतीचे आहे. तानाजी सावंत, सुहास कांदे हे फिरस्ते आहेत. ‘चाय तिकडला न्याय’ हे त्यांचे धोरण. असे अनेक जण आहेत. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, लता सोनवणे या आमदारांवर ईडी व जात पडताळणीसंदर्भात तलवारी लटकल्या होत्या. गुवाहाटीस जाण्यापूर्वी तूर्तास त्यांना अभय देण्यात आले. आता किरीट सोमय्या काय करणार? ‘‘माझ्या ईडीच्या सर्व केसेस क्लीअर झाल्या. मी सुटलो. त्यामुळे मी भाजपा सांगेल ते करतोय,’’ असे सांगून ठाण्याचे एक आमदार सुरतला गेले. पाठोपाठ यामिनी जाधव, लता सोनवणे पोहोचल्या. गुलाबराव पाटील हे स्वतःस शिवसेनेचा वाघ वगैरे म्हणवून घेतात. पान टपरीवरल्या सामान्य शिवसैनिकास शिवसेनेने आमदार व कॅबिनेट मंत्री कसे केले याची वीरश्रीयुक्त कथने जाहीर सभांतून करतात, पण तेच गुलाबराव पाटील यांना कोणीतरी ईडी कारवाईची पोकळ धमकी देताच ते पळून गेले. संदीपान भुमरे यांना मोरेश्वर सावे यांची उमेदवारी कापून तेव्हा पैठणची उमेदवारी दिली. शिवसैनिकांच्या मेहनतीने ते सतत विजयी झाले. आज ठाकरे सरकारात ते कॅबिनेट मंत्री झाले. पैठणच्या एका साखर कारखान्याच्या दारात वॉचमनची नोकरी करणारा हा माणूस शिवसेनेमुळे ३० वर्षे सत्तेत आहे व वेळ येताच पळून गेला. दादा भुसेंपासून अनेक आमदार जे फक्त शिवसेनेमुळे आमदार व मंत्री झाले, ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा भाजपाचा जाच होता व आज महाविकास आघाडीत आहेत तेव्हा त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्रास होतोय,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“भारतीय लोकशाहीचे घाणेरडे चित्र आधी मध्य प्रदेशात दिसले व आता महाराष्ट्रात दिसत आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या बावीस आमदारांनी राजीनामा दिला व ते निवडणुकांना सामोरे गेले. महाराष्ट्रात शिवसेनेने दिलेल्या आमदारकीसह लोक पळून गेले. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा लोकांचा कौल घेतला पाहिजे. आमदारांना या राज्यातून त्या राज्यात व या हॉटेलातून त्या हॉटेलात पळवत ठेवणे ही कसली लोकशाही? ४० आमदार व त्यांच्या नेत्यांना मुंबईत थांबूनही त्यांची भूमिका मांडता आली असती व महाराष्ट्रातील अनेकांना ज्या प्रकारे केंद्राने सुरक्षा पुरवली, तशी सुरक्षा या आमदारांना भाजपने पुरवलीच असती, पण आमदारांना पळवले जात आहे. चार्टर्ड विमाने, गाडय़ा, हॉटेल्स यावर अमर्याद खर्च लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली सुरू आहे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, शिवसेना सोडून छगन भुजबळ व नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. एकनाथ शिंदे तरी होतील काय? शिवसेनेत राहूनच ते मुख्यमंत्री होण्याची खात्री जास्त होती. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्या बरोबर आहे. या आकडय़ांत पैशाला चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ‘ईडी’च्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या शिंदे यांना सोडूनही पळ काढतील. बंडखोरीचा इतिहास तेच सांगतो,” असेही राऊतांनी म्हटले आहे.

“महाराष्ट्रात आजही ठाकरे कुटुंबाविषयी कमालीची आस्था व कृतज्ञता आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी श्रद्धा आहे. बाळासाहेबांचा आत्मा ज्यांनी दुखावला त्यांचे राजकीय श्राद्धच महाराष्ट्रात घातले गेले. २२ जूनला संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून एक भावनाविवश भाषण केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरांत अश्रुधारा वाहिल्या. सांजवेळी ठाकरे व त्यांच्या कुटुंबाने ‘वर्षा’ बंगल्यातून सामान आवरून ‘मातोश्री’कडे प्रस्थान केले तेव्हा रस्त्यात ठाकरेंच्या मानवंदनेसाठी दुतर्फा गर्दी होती. सांजवेळी बाळासाहेबांच्या मुलास घर सोडावे लागले याचा प्रचंड संताप लोकांत, खासकरून महिलावर्गात होता. त्या एका घटनेने महाराष्ट्र हेलावला. अश्रूंत मोठी ताकद असते हे येणारा काळच सिद्ध करील!,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

“या सर्व घडामोडींचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेतील फुटिरांना प्रोत्साहन देऊन फडणवीस सरकार बनवणार असतील तर ते सरकार टिकणार नाही. या सर्व आमदारांची भूक मोठी आहे. त्यांनी आईला सोडले तेथे फडणवीसांना काय साथ देणार? फुटिरांबरोबर सरकार बनवणे म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या ठरतील!,” अशी टीका रोखठोकमधून करण्यात आली आहे.