दिल्लीत मोठी घडामोड घडत आहे. 'भारत जोडो' यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक विधान केलं होतं. त्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना नोटीस बजावली होती. पण, नोटीशीला उत्तर न मिळाल्याने दिल्ली पोलीस राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी आज ( १९ मार्च ) सकाळी पोहचले होते. यावरून भाजपावर काँग्रेस आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीकास्र डागलं जात आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करत अप्रत्यक्षपणे भाजपाला लक्ष्य केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "दिल्लीत आणि देशात अशी अनेक लोक आहेत, ज्यांच्या घरी पोलीस, ईडी आणि सीबीआय जायला हवी. पण, सर्वांना संरक्षण मिळत आहे. विरोधकांच्या घरी पोलीस जात आहेत. आता राहुल गांधींच्या घरी पोलीस गेल्याचं पाहिलं. घरी जाऊन दहशतवाद निर्माण केला, तरी विरोधकांनी ठरवलं आहे, काही झालं तर झुकायचं नाही. त्यामुळे काही फरक पडत नाही." हेही वाचा : सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजुने लागणार?; अशोक चव्हाणांचं सूचक विधान, न्यायाधीशांच्या मतांचा हवाला देत म्हणाले… देशातील काही निवृत्त न्यायामूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत, असं वक्तव्य विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. याबद्दल बोलताना संजय राऊतांनी सांगितलं, "न्यायालयाला सरळ सरळ धमकी देऊन, हा दबाव आणण्याचा प्रकार आहे. जनता हे पाहत आहे." काय आहे प्रकरण? राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये बोलताना महिलांबाबत एक वक्तव्य केलं होतं. "भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक महिला मला भेटल्या. त्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं होतं," असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. याच प्रकरणी संबंधित महिलांची माहिती जाणून घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना नोटीस बजावली होती. हेही वाचा : “उद्धव ठाकरेंची शिवीगाळ सभा, तर एकनाथ शिंदेंची…”, शिंदे गटातील नेत्याचा टोला "आम्हाला संपूर्ण माहिती मिळावी, अशी आमची इच्छा आहे. ज्यामुळे लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रिया सुरू होत पीडितांना न्याय मिळेल. त्याच संदर्भात माहिती मिळवण्यासाठी मी स्वत:हा खासदारांकडे गेलो होतो," अशी माहिती पोलीस आयुक्त ( कायदा आणि सुव्यवस्था ) सागरप्रीत हुडा यांनी दिली.