देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीय. त्यांच्या या आरोपांबद्दल आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात जणू अफू गांजाची शेती पिकते असं देशाला वाटू लागलं आहे. नवाब मलिकांच्या कुटुंबावर खोटा खटला दाखल करण्यात आला होता आणि त्याची वेदना मी समजू शकतो. त्याच्यामुळे आम्ही सगळे मलिकांच्या सोबत आहोत. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांच्या बायकामुलांना त्रास देण्याचा जो प्रयत्न चाललाय ती महाराष्ट्राची संस्कृती नाही”.

ताज्या आणि लाईव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या ड्रग्जच्या व्यवहाराच्या आरोपाबद्दल राऊत म्हणाले, “असं काही असेल तर मला माहित नाही.एनसीबीने याची चौकशी करावी. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी ते सादर करावेत. पण महाराष्ट्रात अशी चिखलफेक होऊ नये”.

काय आहेत देवेंद्र फडणवीसांवरचे आरोप?

देवेंद्र फडणवीस यांचं ड्रग्जच्या धंद्याशी काय कनेक्शन होतं याची चौकशी व्हावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. जयदीप राणा आणि नीरज गुंडेसोबत त्यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी व्हावी. यासंदर्भात न्यायिक चौकशी व्हावी, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करावे, असं आवाहन फडणवीस यांना केलंय. तसेच फडणवीसांचे या ड्रग्ज प्रकरणाशी काय संबंध आहेत, याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली. भाजपामध्ये अनेक जण ड्रग्ज पेडलर होते, असाही आरोप मलिक यांनी केलाय. मला बोलण्यापासून रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू होता, असा स्पष्ट आरोप मलिक यांनी केलाय.