Devendra Fadbavis vs Uddhav Thackeray: महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशा कलगीतुऱ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी “एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे फडणवीसांनी “मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, पहले ही कई फसानों का रुख मोड़ चुका हूँ मैं”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यावर राजकीय चर्चा चालू असताना त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे.

ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं आहे. “उद्धव ठाकरेंनी टीका केलेली नाही, तर तलवार उपसली आणि घाव घातला. देवेंद्र फडणवीसही संघ विचारांचेच आहेत. पण त्या व्यक्तीने कोणती संस्कृती महाराष्ट्रात पाळली आहे? कोणते नियम पाळले? जे संघाला सुसंस्कृत, प्रखर राष्ट्रवादी मानतात त्यांना मी देवेंद्र फडणवीसांचं उदाहरण देईन. माणूस किती अनीतीमान, असंस्कारी, भ्रष्ट, क्रूर असू शकतो, कपटी, कारस्थानी असू शकतो हा संघाचा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. अशा लोकांमुळेच संघ बदनाम झाला”, असं संजय राऊत म्हणाले.

“उद्धव ठाकरेंचा संताप समजून घेतला पाहिजे. ते म्हणाले तू तरी राहशील किंवा मी तरी राहीन. पण आम्ही म्हणतो, आम्हीच राहू, ते जातील. पुन्हा येईन-पुन्हा येईन हे जसं हवेत विरून गेलं, तसंच हे आहे. ही व्यक्तिगत टीका नसून महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली लढाई आहे”, असंही संजय राऊतांनी नमूद केलं.

“फडणवीसांनी दळभद्री राजकारण केलं”

“संघाला फार मोठी परंपरा आहे. पण लफंग्यांच्या टोळ्या घेऊन देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात दळभद्री राजकारण सुरू केलं. त्याचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय. महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली आहे. त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत. मी हे अनेकदा सांगितलं आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली.

“तुम्ही आमच्या नादी लागाच”

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी “नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही”, असं विधान केल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यावरही संजय राऊतांनी तोंडसुख घेतलं. “नका सोडू. तुम्हाला कुणी म्हटलं की आमच्या नादी लागू नका? तुम्ही आमच्या नादी लागाच. तुम्ही नादी लागणार म्हणजे काय करणार? पोलिसांना, ईडी, सीबीआयच्या लोकांना सांगणार. आधी तुरुंगात असलेला रोमी भगत कुणाचा माणसू आहे? ते सांगा. तो कुणाचा माणूस आहे हे सांगा. त्याच्या माध्यमातून या लोकांनी किती हजार कोटी गोळा केले हे सांगा. आमचं आव्हान आहे. नादी तुम्ही लागाच. बोलकी पोपटगिरी बंद करा. नादी लागण्याची तुमची हिंमत आणि छाती नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis : “मेरी हिम्मत परखने की गुस्ताखी मत करना”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना शायरीतून प्रत्युत्तर

“ईडी, सीबीआय ही सगळी कवचकुंडलं काढा आणि मैदानात या. नाही तुम्हाला २० फूट गाडलं तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही परत घेणार नाही”, असंही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?

देवेंद्र फडणवीसांना भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राऊत म्हणाले, “फडणवीसांनी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व्हावं. संघ म्हणजे असंस्कारी, अनीतीमान, असुसंस्कृत लोकांना पाठिशी घालणारं संघटन झालं आहे. आम्ही बाळासाहेब देवरसांचा संघ पाहिला आहे, रज्जू भय्यांचा संघ पाहिला आहे. आम्ही त्यांच्या चरणांना हात लावलेला आहे. त्यांच्या पायांवर डोकं ठेवलेलं आहे. संविधानाच्या चिंधड्या उडवणारे लोक सत्तेत बसले आहेत. संघ काय करतोय? ज्या संघाचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एका टिंबाएवढंही योगदान नव्हतं, ज्या संघाचे लोक चले जाव ची चळवळ चिरडून टाका असं पत्र इंग्रजांना लिहीत होते, त्यांनी आमच्याशी लढण्याची भाषा करायची नाही”, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली आहे.

“हे सरकार औटघटकेचं आहे. देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत नागपूरमधून पराभव होत आहे. नागपूरचा काय सातबारा आहे का कुणाच्या नावावर? जर नरेंद्र मोदी वाराणसीत धडपडत जिंकू शकतात आणि शेवटच्या क्षणी विजय मॅनेज करू शतात, तर देवेंद्र फडणवीस तर सहज हरू शकतात. हे काय अजिंक्य लोक आहेत का? काय करणार हे? पोलीस, ईडी आणून ठेवणार आणि धमक्या देणार. बाकी हे काय करू शकतात?”, असंही संजय राऊत म्हणाले.