विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने महायुतीला जनमत दिले आहे. असं असलं तरी ५०-५० सुत्रामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेचे तिढा सुटलेला नाही. एकीकडून शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज आक्रामक भुमिका मांडताना दिसत आहे. प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्याबरोबरच राऊत ट्विटवरुनही रोज एखादे ट्विट करुन भाजपाला टोला लगावता दिसत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले असतानाच राऊतांनी प्रवास करण्यावरुन ट्विट करत एक टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांचा आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्र चालताना फोटो आहे. या फोटोला त्यांनी “जय हिंद” असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर ‘लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है’ असे वाक्य लिहिलेले आहे. सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापन करणे हे भाजपा आणि शिवसेनेचे लक्ष्य असून त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा विचार दोन्ही पक्षांकडून सुरु असतानाच राऊत यांनी हे ट्विट केले आहे.

रविवारीही राऊत यांनी शायर वसीम बरेलवी यांचा शेर ट्विट करत भाजपाला टोला लगावला होता. ‘उसूलों पर जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है जो ज़िन्दा हो, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है…’ असं ट्विट राऊतांनी केलं होतं.

दरम्यान, आज (सोमवारी) संजय राऊत हे राज्यपालांची भेट घेणार आहे. तर दुसरीकडे फडणवीस हे दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. या बैठकीमध्ये राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कसा सोडवता येईल यासंदर्भात चक्चा करणार आहेत.