Beed Sarpanch Santoh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh 12th Result: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. हत्येनंतर तपासासाठी आंदोलन, घरात लहान भाऊ, रडणारी आई, लढणारा काका असे सगळे चित्र असतानाही संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखने बारावीला चांगला अभ्यास करत घवघवीत यश मिळविले आहे. आज बारावीचा निकाल लागला असता वैभवीला ८५.१३ टक्के गुण मिळाल्याचे समोर आले.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. फरार आरोपींची काही दिवस अटक झाली नाही. तसेच या प्रकरणात रोज नाट्यमय घडामोडी घडत होत्या. अशात वैभवी देशमुख आपले काका धनंजय देशमुख यांच्यासह खंबीरपणे उभी राहिली. लहान भाऊ आणि आईला सावरत ती आंदोलनातही हिरीरीने सहभागी होऊन आपल्या वडिलांसाठी न्याय मागत होती.

परीक्षेच्या काळातही वैभवी देशमुखचा संघर्ष आणि दौरे थांबलेले नव्हते. वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबविणार नाही, असा निर्धार केलेल्या वैभवीने अशातच परीक्षा दिली आणि त्यात चांगले यशही मिळवले आहे. तिचे हे यश पाहायला आज वडील असायला हवे होते, अशी भावना मस्साजोगचे ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज महाराष्ट्रात बारावीचे निकाल जाहीर झाले असून राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालात ६ लाख २५ हजार ९०१ मुली, तर ६ लाख ७६ हजार ९७२ मुले उत्तीर्ण झाली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे यातून दिसून येत आहे.