सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा कमी झाला आहे. परिणामी, रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी रक्तपेढ्यांना स्थळांची शोधाशोध करावी लागत आहे. त्यात निगेटिव्ह रक्तगटाची मोठी कमतरता भासत आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये दहा दिवस, तर काही ठिकाणी चार दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे.
त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांतर्फे करण्यात आले आहे. उन्हाळी सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने रक्त साठा कमी झाला आहे. सातारा जिल्ह्यात एकूण १२ ब्लड बँक असून त्यात दोन सरकारी व दहा खासगी आहेत. यात सरकारी ब्लड बँक जिल्हा रुग्णालय व कराड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आहे. याव्यतिरिक्त खासगी रक्तपेढ्यांकडे साठवणूक क्षमता आहे. जिल्ह्यात दररोज एका रक्तपेढीत १५ पिशव्यांची गरज भासते.
उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने अनेक रक्तदाते रक्तदान करत नाहीत. महाविद्यालयांना सुट्या असतात. अनेक जण बाहेरगावी जातात. त्यामुळे शिबिरांची संख्या कमी होते. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे नियोजित शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होते. बाहेरगावाहून उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने अनेकदा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. शिबिरांचे नियोजन केल्याने तुटवडा निर्माण होणार नाही. गेल्या काही दिवसांत रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रक्त संकलनावर परिणाम झाला असून सद्य:स्थितीत जिल्हा रुग्णालयात १५० पिशव्यांचा साठा उपलब्ध आहे.
उन्हामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटते. सुट्यांमुळे शिबिरांची संख्या कमी होते. नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढते. बाहेरगावाहून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने साठा पुढील दहा दिवस पुरणार आहे. येत्या काही दिवसांत शिबिर आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. युवराज कर्पे, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा