वाई सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकांना ३२० शाखा व ९५३ विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून बँकिंग सुविधा पुरवित आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण गतीमान करण्यासाठी बँकेने विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी सभासदांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांचे रहणीमान उंचावणेसाठी बँक नेहमीच प्रयत्नशील असते. पीक कर्ज वाटपात सातारा जिल्हा बँक राज्यात आघाडीवर आहे. खरीप पिकासाठी निश्चित केलेले साडेनऊशे कोटी रुपयांपैकी नव्वद टक्के कर्ज वितरण करण्यात बँक राज्यात आघाडीवर आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, दुष्काळ, पूर परिस्थिती, करोनासारखे साथीचे रोग अशा अडचणीच्या परिस्थितीत सातारा जिल्हा बँकेने सढळ हाताने मदत केलेली असून वसुली प्रोत्साहनासाठी व्याज परतावा योजना राबविणारी एकमेव बँक म्हणून सातारा जिल्हा बँकेचा उल्लेख केला जातो. जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट रुपये बाविशे कोटी आहे. त्यातील सातारा जिल्हा बँकेचे रुपये तेराशे कोटी उद्दिष्ट आहे. चालू खरीप हंगामासाठी बँकेने एक लाख ५४ हजार ३३२ शेतकरी सभासदांना रुपये ८५० कोटीचें वाटप केले आहे. आजपर्यंत बँकेची पीक कर्जाची ८५ टक्के वसुली झाली असून बँकेची शंभर टक्के वसुलीची परंपरा कायम राखण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे, अशी माहिती आमदार भोसले यांनी दिली. खरीप पिकासाठी निश्चित केलेले उद्दिष्टांपैकीपैकी आज अखेर नव्वद टक्के कर्ज वितरण करण्यात बँक राज्यात आघाडीवर आहे. करोना महामारीमुळे मर्यादा असतानाही बँक कर्ज वाटपात आघाडीवर राहिल्याने जिल्ह्याचे उदिष्ठ पूर्ण होणेस हातभार मिळाला आहे. जिल्हा पत पुरवठा आराखाड्यात एकट्या सातारा जिल्हा बँकेचा हिस्सा नेहमीच ७५ ते ८० टक्के राहिला आहे. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकरी सभासदांना कर्ज मुक्तीचा लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना २२ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार व बँक धोरणाप्रमाणे सभासदांचे कर्ज खात्यावरील रक्कम शासन येणे दाखवून नवीन पीक कर्ज वाटप सुरु करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.