कराड : सातारा जिल्ह्याचा जलसाठा तब्बल १०२.०८ टीएमसी (६४.८२ टक्के) झाला आहे. कोयना, धोम, धोम- बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या सहा मोठ्या आणि १० मध्यम धरणांचा जलसाठा एकूण १५७.४८ टीएमसी (अब्ज घनफूट) असून, सध्या यातील मोठ्या धरणात ९६.८९ टीएमसी आणि मध्यम धरणात ५.१९ टीएमसी असा एकूण १०२.०८ टीएमसी (६४.८२ टक्के) जलसाठा झाला आहे. तो गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट असून, गतखेपेस हा जलसाठा ३४.०६ टीएमसी (२१.६२ टक्के) राहिला होता.

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, मोरणा, हातगेघर, उत्तरमांड, वांग- मराठवाडी हे प्रकल्प भरून वाहिले असून कोयना, कण्हेर, उरमोडी धरणातून पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जलविसर्ग सुरू आहे. गेल्या दीड- पावणेदोन महिन्यातील वळीव आणि त्यानंतरच्या मोसमी पावसाने जलाशयात तुलनेत उच्चांकी जलसाठा झाला आहे.

पश्चिम घाटातील धरणक्षेत्रासह डोंगरमाथ्यांवर जोरदार तर, अन्यत्र पावसाची रिपरिप कायम आहे. सलग जोरदार पावसाने कोयना शिवसागरात दिवसागणिक अडीच ते पावणेतीन टीएमसी पाण्याची आवक सुरू असून, जलसाठा ६७.२० टीएमसी (६३.८५ टक्के) झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो तिपटीहून अधिक आहे. गतवर्षी हाच जलसाठा २६.४७ टीएमसी (२५.१४ टक्के) राहिला होता.

कोयना शिवसागरात २५,७७६ घनफूट (क्युसेक) पाण्याची आवक सुरू असून, आज रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना पाणलोटक्षेत्रात १४.६६ मिमी, तर एकूण १८७७.३३ मिमी (वार्षिक सरासरीच्या ३७.५४ टक्के) पाऊस झाला आहे. गतवर्षी आजमितीचा हाच पाऊस ११२ मिमी, तर एकूण १२७५ मिमी (वार्षिक सरासरीच्या २५.५० टक्के) झाला होता. तर, कोयनेचा धरणसाठा २६ टीएमसी (२५ टक्के) राहिला होता. यंदा गतवर्षीच्या तुलनेत एकंदरच पाऊसमान आणि जलसाठ्यांची स्थिती अतिशय भक्कम राहिली आहे. मात्र, अतिपावासाने खरिपाच्या पेरण्यांना संकटात टाकले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांच्या कालावधीत कडवी धरणक्षेत्रात ३४, कुंभी १०, वारणा १७, धोम- बलकवडी १२, धोम ९ मिमी तर, अन्य जलाशय परिसारात तुरळक पावसाचे चित्र आहे. ठोसेघर धबधब्यावर ३३ मिमी पाऊस झाला असून, सातारा तालुक्यातील सांडवली येथे सर्वाधिक ४७ एकूण २,६१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.