Shambhuraj Desai Satara News Update regarding police clash and SP suspension orders in Vidhan Parishad : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाल्याची घटना घडली होती. यावेळी राष्ट्रावादी काँग्रेस आणि शिवसेना सदस्य, नेत्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. ज्यामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली, यानंतर आज विधानपरिषदेत हा मुद्दा चांगलाच गाजला. शंभूराज देसाई यांनी घडलेला घटनाक्रम सांगत संबंधित पोलिसांवर कारवाईची तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली, ज्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संबंधितांविरोधात कारवाईचे निर्देश दिले आहेत.
शंभूराज देसाईंनी सांगितला घटनाक्रम
मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात घडलेल्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती दिली. आम्ही ३३ सदस्य मतदानासाठी जात होतो. आमची बैठक झाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे ठरलं होतं. संदीप मांडवे आणि अनिल देसाई या दोन सदस्यांवर गुन्हा दाखल झाला ते आमच्याबरोबर बैठकीला हजर होते. ज्यांचं अपहरण झालं म्हणून सांगितलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य बापूसाहेब शिंदे आमच्याबरोबर होते. बैठकीच्या ठिकाणी देखील साध्या वेशातील पोलीस होते. अटकच करायचे होते तर तिथे का केले नाही. कारण तेथे दोन हजार शिवसैनिक होते. तिथे पोलिसांचे आमच्या सदस्यांना हात लावण्याचे धाडस झाले नाही, असे शंभुराज देसाई म्हणाले.
या सभागृहात देखील आम्ही सुरक्षित आहेत की नाही असे वाटण्याची वेळ आली आहे. आम्ही चौथ्या मजल्यावर चाललो होतो. मांडवे म्हणत होते की पालकमंत्री आहेत, मला मतदानासाठी जाऊ द्या. त्यावेळी चार-चार पोलिसांनी दोन्ही दंडाला धरले, दोघांनी कंबरेला धरून सदस्यांसकट फरपटत घेऊन गेले. खासदार नितीनकाका यांना पायऱ्यांवरून खाली पाडलं, असेही देसाई यावेळी म्हणाले.
“साध्या वेशातील शंभर पोलीस… म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, चार लाख लोकातून निवडून आलो आहोत. एवढा माजोरीपणा केला. त्या गोंधळात मला काय लागलं माहिती नाही, माझ्या शर्टावर रक्त, संदीप मांडवे यांच्या शर्टावर रक्त होतं… माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यानंतर त्याने रुमाल काढून दिला. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्यांना पोलीस पळवत घेऊन गेले,” असे शंभूराज देसाई यांनी सभागृहात बोलताना सांगितले.
एसपी हे एखाद्या घरगड्यासारखे वागले. माझी विनंती आहे की, त्यांना तात्काळ निलंबित करा, सेवेतून बडतर्फ करा. त्यांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत त्यांची चौकशी करा. हा आम्ही अन्याय सहन करणार नाही. माझी हात जोडून विनंती आहे, मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या पोलीस दलाचे प्रमुख तुषार दोषी, एलसीबीचे इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचे असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे १०० पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबीत करा, अशी मागणी शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत बोलताना केली.
निलम गोऱ्हे यांचे निलंबनाचे निर्देश
शंभूराज देसाई यांनी मागणी केल्यानंतर विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. “ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी-ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केले आणि महत्त्वाचे म्हणजे, मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवले आहे त्यांचे सरकारने निलंबन करावे असे मी निर्देश देत आहे,” असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.
या सभागृहात आमदार सांगतात ते खरं मानलं जात, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे, हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे. एवढी घटना घडल्यानंतर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते ते काही कारणाने गेलेले नाहीत, असेही गोऱ्हे यांनी यावेळी नमूद केले.
