सावंतवाडी: अतिवृष्टी, बदलते हवामान आणि वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून गेलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात खतांच्या महागाईचा मोठा झटका बसला आहे. दरम्यान, युरिया खताची खरेदी-विक्री करताना सातबारा उतारा घेऊनच खत दिले जावे, अशा अटी लादल्या जात असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून नको ते उद्योग करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे शेतकरी कमालीचे नाराज झाले आहेत, असे सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी सांगितले.
सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या मासिक बैठकीत खरीप हंगामातील पीक आणि खतांच्या वाढत्या दरांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले जात असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. या बैठकीला उपाध्यक्ष राजन रेडकर, माजी सभापती प्रमोद सावंत, संचालक विनायक राऊळ, शशिकांत गावडे, प्रवीण देसाई, दत्ताराम हरमलकर, रश्मी निर्गुण, अभिमन्यू लोंढे, व्यवस्थापक महेश परब आदी उपस्थित होते.
युरिया खताची खरेदी करताना शेतकऱ्यांना सातबारा उतारा आणि शेतकरी ओळखपत्र (फार्मर आय डी) सक्तीचे करण्यात आल्याबाबत बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त झाली. तसेच भात बियाणे आणि खतांचे नमुने तपासणीसाठी काढून ठेवण्याची सक्ती केली जाते. खरेतर, खते आणि बियाणे कंपन्यांकडून खरेदी करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खरेदी विक्री संघ करत असतो. असे असताना तपासणीसाठी काढून ठेवाव्या लागणाऱ्या नमुन्यांमुळे खरेदी विक्री संघाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
कृषी विभागाने परस्पर संबंधित खते आणि भात बियाणे कंपन्यांकडूनच हे नमुने गोळा केले पाहिजेत. पण तसे होत नसल्याने कृषी विभागाच्या पथकाला आणि नवनवीन नियमांना खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. या नियमांमुळे शेतकऱ्यांना सेवा देताना फारच त्रास सहन करावा लागत असल्याचे चर्चेतून समोर आले.
यंदा खतांचे दर गगनाला भिडले आहेत. खरीप हंगाम २०२५ ला संपुर्णा ५० किलोची जी पिशवी १८०० रुपयांना मिळत होती, तीत तब्बल ५०० रुपयांची वाढ होऊन तो दर २३०० रुपयांपर्यंत गेला आहे. याशिवाय सुफला खताचा दर १६५० रुपयांवरून २०२५ रुपये, आयपीएल १४५० वरून २२५० रुपये, तर कृषी उद्योग खताचा दर १२४० रुपयांवरून १४०० रुपये झाला आहे. खतांच्या किमती सातत्याने वाढत असताना कृषी विभाग मात्र जाचक अटी लादत असल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. तसेच खंत कंपन्यांनी कॅश अण्ड कॅरी चे धोरण अवलंबिले आहे त्यामुळे एवढे खेळते भांडवल उभे करण्यास अडचणी येतात. त्यामुळे खंत कंपन्यांच्या धोरणात बदलाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकरी आधीच बदलते हवामान, अतिवृष्टी, पावसाचे कोलमडलेले वेळापत्रक, वन्य प्राण्यांचा त्रास आणि शेतमजूर मिळत नसल्याने अत्यंत निराशाजनक अवस्थेतून जात आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी व संस्थांना आणखी वेठीस धरू नये, एवढीच अपेक्षा अध्यक्ष प्रमोद गावडे आणि माजी सभापती प्रमोद सावंत यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
