सावंतवाडी: तालुक्यातील इन्सुली क्षेत्रफळ डोबवाडी येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीत १५ पिल्लांसह पडलेल्या साधारण सात ते आठ फूट लांबीच्या महाकाय मगरीला वन विभागाने सुखरूप बाहेर काढले आहे. वन विभागाच्या टीमने अत्यंत शिताफीने मोहीम राबवत एकूण १६ मगरींना जीवदान दिले असून, त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले आहे. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

​इन्सुली येथील रहिवासी संतोष नेवगी यांच्या शेतातील विहिरीत एक मोठी मगर आणि तिच्यासोबत लहान पिल्ले असल्याचे रविवारी निदर्शनास आले होते. विहिरीत मगर असल्याची बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. नेवगी यांनी याबाबत तातडीने वन विभागाला माहिती दिली.

​घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक मिलिश शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील आणि सावंतवाडी येथील आर. आर. टी. (रॅपिड रेस्क्यू टीम) तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. विहिरीची खोली आणि मगरीचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, वन विभागाच्या पथकाने आधुनिक साधनांचा वापर करून प्रथम मोठ्या मगरीला आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा तिच्या १५ लहान पिल्लांना विहिरीबाहेर काढले.

​अशाप्रकारे एकूण १६ मगरींना सुखरूप पकडण्यात वन विभागाला यश आले. या सर्व मगरींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे.

​या धडक मोहिमेत पथक प्रमुख बबन रेडकर, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, देवेंद्र परब, पुंडलिक राऊळ, वनरक्षक अतुल पाटील, वनरक्षक पवन तारपे आणि वनरक्षक सदाशिव मोहिते यांनी सक्रिय सहभाग घेतला. वन विभागाच्या या तत्परतेबद्दल आणि धाडसी कामगिरीबद्दल इन्सुली गावकऱ्यांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

दरम्यान मगरींच्या वापरामुळे शेतकऱ्यांना भिती वाटते. पाळीव जनावरे आणि स्वतः मगरी पासून बचाव करण्यासाठी पुढाकार घेतात. जवळपास तेरेखोल नदी वाहते. या नदीच्या पात्रात मगरींचे साम्राज्य आहे. अतिवृष्टीत नदीला पूर आला तर या मगरी लोकवस्ती मध्ये येण्याची भिती लोकांना सतत वाटत असते तसेच नदी पात्रातील पाणी पातळी घटली आहे त्यामुळे देखील मगरी नदी पात्रा बाहेर येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना सतत चिंता वाटत आहे.