सावंतवाडी : सावंतवाडी शहराचे मुख्य आकर्षण असलेल्या मोती तलावाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या फुटपाथची आता पुनर्बांधणी केली जात आहे. मात्र, या कामात अडथळा ठरणारी ४१ अशोकाची झाडे तोडण्याचा निर्णय नगरपरिषदेच्या पहिल्याच मासिक बैठकीत घेण्यात आला. झाडांच्या मुळांमुळे फुटपाथचे पेव्हर ब्लॉक उखडले जात असल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी तलावाच्या काठावरील फुटपाथचा दर्जा वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
श्रीमंत बापूसाहेब महाराज पुतळा ते राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि तेथून श्रीमंत शिवरामराजे भोसले पुतळ्यापर्यंतच्या फुटपाथचे काम नगरपरिषदेने हाती घेतले आहे. सध्या असलेल्या अशोकाच्या झाडांची मुळे पेव्हर ब्लॉकच्या खाली गेल्याने रस्ता ठिकठिकाणी खराब झाला आहे. हे काम टिकाऊ व्हावे, यासाठी ही झाडे काढणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.
नगरसेवकांकडून सावलीची चिंता:
या निर्णयावर चर्चा करताना शिवसेना नगरसेवक संजू परब यांनी पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “मोती तलावाच्या काठावर नागरिक आणि मुले विरंगुळ्यासाठी बसतात. झाडे तोडल्यामुळे त्यांची सावली हिरावली जाणार नाही, याची खबरदारी नगरपरिषदेने घ्यावी. तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या जागी तातडीने नवीन झाडे लावण्यात यावीत.”
नगराध्यक्षांचे आश्वासन:
यावर बोलताना नगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी स्पष्ट केले की, फुटपाथचे काम दर्जेदार करण्यासाठी ही झाडे काढणे गरजेचे आहे. मात्र, नगरसेवकांनी सुचवल्यानुसार पर्यायी वृक्षारोपण आणि नागरिकांच्या सोयीचा विचार करूनच पुढील पावले उचलली जातील.

