Maharashtra Rain News Updates, 11 July 2022 : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना खासदारांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेतील बंडखोरी, राष्ट्रपतीपदाची निवडणूक अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
तर दुसरीकडे शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांविरोधात केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी होती. मात्र सरन्यायाधीश रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी जाहीर करण्यात आली. त्यात या याचिकांचा सुनावणीसाठी समावेश नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीचे नेमके काय होणार, याबाबत संदिग्धता आहे.
तर दुसरीकडे राज्यात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस सुरु आहे. कोणण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई आणि उपनगरांतही पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे मुंबईच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर अनेक ठिकाणी नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या सर्व घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स एका क्लिकवर.
Maharashtra Latest News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना २००४ साली कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्याकडे केवळ सहा महिने उरले असल्याचं सांगितलं होतं. पण संबंधित डॉक्टरांचा अंदाज पवारांनी खोटा ठरवून दाखवला आहे. आज २०२२ साल सुरू असताना ते आठवड्यातील चार दिवस राज्याच्या दौऱ्यावर असतात. २००४ साली कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्यांचा डॉक्टरांशी जो संवाद झाला होता, याबाबतचा एक किस्सा शरद पवार यांनी सांगितला आहे. सविस्तर बातमी
पिंपरी पालिकेतील वैद्यकीय विभागात मानधनावर १५ वर्षांपासून काम करणाऱ्या आणि करोनाच्या संकट काळातही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणाऱ्या परिचारिकांना महापालिका सेवेत कायम करण्याऐवजी पालिकेने सुरू केलेल्या नव्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सविस्तर वाचा बातमी…
शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तापालट झाला आहे. पण बंडखोर आमदार अद्याप कोणत्याही पक्षात सामील झाले नाहीत, ते अजूनही शिवसेनेत असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची? हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालयात दाखल केलेल्या विविध याचिकांवर आज सुनावणी होणार होती. पण हे प्रकरण घटनापीठाकडे द्यावं लागेल, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत कलहात आता पुढे काय निर्णय होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सविस्तर बातमी
नदीत बुडणाऱ्या अनोळखी व्यक्तीला वाचवण्यासाठी दोन तरुणांनी नदीत उडी घेतली. यात तो व्यक्ती वाचला सुद्धा. मात्र वाढता पाण्याचा प्रवाह आणि पाण्याचा अंदाज न आल्याने वाचवणाऱ्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा बातमी…
करोना विषाणू संसर्गाचे निदान आता अवघ्या वीस सेकंदात करणे शक्य होणार आहे. पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स आणि पोर्टलँड स्थित हेमेक्स हेल्दकेअर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘गॅझेल – पॅथोकॅच’ असे या चाचणी संचाचे नाव आहे. सविस्तर वाचा बातमी…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक आयोजित केली होती. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित १६ खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
लोणवळ्यातील भुशी धरणात पर्यटक तरुण बुडल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी घडली असून लोणावळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. साहिल सरोज अस बुडालेल्या तरुणाच नाव आहे. विकेंड आणि येरव्ही लोणावळ्यात वर्षाविहारसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सविस्तर वाचा बातमी…
येत्या काही दिवसात देशात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या भाजपाकडून द्रौपदी मूर्मू राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधीपक्षाकडून यशवंत सिन्हा हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा द्यावा, अशी मागणी काही शिवसेना खासदारांनी केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीवरून काही खासदारांची खदखद सुरू असताना शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. सविस्तर बातमी
भारतीय नौदल आणखी सक्षम होण्याच्या दृष्टीने आता एक पाऊल पुढे पडत आहे. कोच्ची शिपयार्ड तर्फे लवकरच ‘आयएनएस विक्रांत'(INS Vikrant) ही स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका (aircraft carrier) ही नौदलाकडे सुपूर्त केली जाणार आहे. त्यानंतर येत्या १५ ऑगस्टला नौदलाच्या सेवेत आयएनएस विक्रांत दाखल होणार आहे. याआधीच आयएनएस विक्रमादित्य विमानवाहू युद्धनौका नौदलात कार्यरत आहे. पण गरज आहे तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची….
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी व उपाय योजने संदर्भात माहिती दिली.
वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कठोर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांत ११ हजार २१६ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याचे कारवाईतूनही समोर आले आहे.सविस्तर वाचा बातमी…
मालकी हक्क व विस्तारित गाळ्यात वाट्याला काय येणार? यातून दोन गटात आज (सोमवार) दुपारी मिरजेतील मटण मार्केटमध्ये जोरदार धुमश्चक्री माजली. आमदार सुरेश खाडे यांनी नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ करून आमदारांची पाठ फिरताच दोन गटात दगड, विटा, हत्यारे, काठ्यांनी मारामारी झाली. अखेर पोलिसांनी सौम्य छडीमार करून वाद आटोक्यात आणला. वाचा सविस्तर बातमी…
मुंबईत करोनाच्या प्रादुर्भावामध्ये झपाट्याने घट होत असून बाधितांचे प्रमाण चार टक्क्यापर्यंत कमी झाले आहे, तर दैनंदिन करोनाबाधितांचा आलेखही ५०० च्या खाली गेला आहे. मुंबईतील चौथी लाट तिसऱ्या लाटेप्रमाणेच जलद गतीने वाढली, त्याच रीतीने ओसरायलाही सुरुवात झाली आहे. जुलैच्या पहिल्या दहा दिवसांतच बाधितांचे प्रमाण सुमारे १० टक्क्यांवरून आता चार टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. वाचा सविस्तर बातमी…
घरकाम करणाऱ्या महिलेने तीन लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना मार्केट यार्ड भागात घडली. या प्रकरणी घरकाम काम करणाऱ्या महिलेच्या विरोधात मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…
राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल तक्रारीची सुनावणी २८ जुलैपर्यंत न घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आज (सोमवार) गिरगाव महानगरदंडाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे गिरगाव न्यायालयात हजर राहावे लागण्यापासून राहुल यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर बातमी…
मुंबईमध्ये १९९३ साली साखळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या प्रमुख दोषींपैकी एक असणाऱ्या आबू सालेमला तुरुंगामधून सोडलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज म्हणजेच ११ जुलै २०२२ रोजी केंद्र सरकारला पोर्तुगाल सरकारशी झालेल्या कराराची आठवण करुन दिली. केंद्र सरकारने पोर्तुगाल सरकारला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आबू सालेमला काही वर्षांमध्ये सोडून दिलं जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने प्रत्यार्पण करारादरम्यान पोर्तुगालला दिलेल्या शब्दांचा सन्मान राखण्यासाठी सालेमला तुरुंगवासातून मुक्त करावं लागेल, असं न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितलं आहे. पण भारत आणि पोर्तुगालमध्ये नेमका कोणता करार झालेला?, त्यात भारताने काय शब्द दिलेला जाणून घ्या सविस्तर येथे क्लिक करुन.
विश्लेषण: अजून आठ वर्षांनी अबू सालेम तुरुंगातून सुटणार? २००५ मध्ये भारत-पोर्तुगालमध्ये नेमका काय करार झाला?https://t.co/UP1kfWCqAo
— LoksattaLive (@LoksattaLive) July 11, 2022
जाणून घ्या नेमकं हे प्रकरण आहे तरी काय…#AbuSalem #portugal #india #SupremeCourt
शाळकरी मुलांना मोबाईलचे व्यसन लागल्यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पालकांनी मुलांना मोबाईल वापरण्यास मनाई केली तर संतापतात. अशीच एक घटना नागपुरात उघडकीस आली असून पालकांनी मुलाच्या हातून मोबाईल हिसकावल्याने संतापलेल्या मुलाने घरातून पलायन करीत थेट मुंबई गाठली. पोलिसांनी दोन दिवस परिश्रम घेत मुलाचा शोध घेतला. त्याचे समुपदेशन करून त्याला पालकांच्या स्वाधीन केले. ही घटना वाठोड्यात घडली. निशांत सुरेश सहारे असे मुलाचे नाव आहे. सविस्तर वाचा
राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी – नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने मुंबईत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांना याबाबत पत्र दिले आहे.
उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात गेल्या आठवड्यापासून मोसमी पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात भीमनगर इसासनीमधील नाल्याच्या पुरात महिला आणि त्यांची १७ वर्षांची मुलगी पुरात वाहून गेली. महिलेचा मृतदेह सापडला असून मुलीचा शोध सुरू आहे. सुकवण म्हात्रे असे मृत आईचे, तर अंजली म्हात्रे असे मुलीचे नाव आहे. वाचा सविस्तर बातमी…
गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर दाखल झाले आहेत. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऐवजी ते रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे रवाना झाले आहेत.
बहुप्रतिक्षित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे ५० टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आज (सोमवार) दिले. त्यामुळे या टिटवाळा मुरबाड रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर बातमी…
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर, कांजूरमार्ग येथे होणारं मेट्रो कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी मंडळींनी 'आरे वाचवा' आंदोलन तीव्र केलं आहे. दर रविवारी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. अलीकडेच झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी नव्या सरकारवर टीका केली होती. सविस्तर बातमी
ठाणे येथील कोपरी भागातील महापालिकेच्या प्रभाग समिती इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा बाहेरील सज्जा आज (सोमवार) दुपारी पडला. या घटनेत कुणीही जखमी झालेले नसले तरी दोन दुचाकींचे नुकसान झाले. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने इमारतीमधील कार्यालय तत्काळ बंद केले असून, ते इतरत्र हलविण्यासाठी पावलं उचलली आहेत. वाचा सविस्तर बातमी…
तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हदेखील जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना शिवसेनेने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती शिवसेनेने केली केली आहे. वाचा सविस्तर
“भाजपा हा राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात जातीय तेढ निर्माण करून, मतांच्या धृवीकरणाचा खेळ चालवत आहे. आमचे प्राण गेले तरी चालेल पण, अमरावती भाजपची प्रयोगशाळा होऊ देणार नाही. देशामध्ये ज्या हिंसक घटना घडत आहेत, त्या घटनांमागे भाजपचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असून अमरावती आणि उदयपूरच्या घटनांमध्येही ते दिसून आले आहे.” असा आरोप काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत केला. वाचा सविस्तर बातमी…
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मुख्य केंद्र असलेले टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ताबा मिळविला असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील शिवसेनेच्या शाखाही ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न सुरु केले आहेत. शिंदे गटाचे कार्यकर्ते शाखांमध्ये जाऊन त्यांना शिंदे गटात सामील होण्यास सांगत असून त्यास काही जणांकडून नकार दिला जात असल्याने दोन्ही गटात वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शाखा कुणाच्या असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. वाचा सविस्तर बातमी…
मध्यप्रदेशमधील रतलाम येथील भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार प्रल्हाद पटेल यांचा अचंबित करणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्यांच्या घरांवर काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे, तो काढून टाकण्याचे पटेल सांगत आहेत. तसेच ज्यांच्या घरावर काँग्रेसचा झेंडा आहे, त्यांच्या सर्व सुविधा बंद करा, असे ते आपल्या सहकाऱ्यांना सांगताना दिसत आहे. पटेल यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. वाचा सविस्तर
आषाढी एकादशीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र राहुल यांनी मराठीत केलेली ही पोस्ट अनेकजण भाजपाचे आमदार नितेश राणेंनी पाठवतानाचं चित्र सोशल मीडियावर दिसत आहे. येथे क्लिक करुन जाणून घ्या नेमकं यामागील कारण तरी काय…
"‘मी’पणा विसरुन ‘आम्ही’ अशी व्यापक…"; राहुल गांधींनी मराठीतून लिहिलेली आषाढीची पोस्ट अनेकांनी नितेश राणेंना पाठवली, कारण…https://t.co/h7KFHsKlJu
— LoksattaLive (@LoksattaLive) July 11, 2022
जाणून घ्या नेमकं घडलंय काय…#RahulGandhi #NiteshRane #BJP #Congress #Viral #Facebook
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचीरोली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. अतिवृष्टी तसेच पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यसाठी ते गडचीरोली जिल्ह्याकडे रवाना झाले आहेत. तेथे जिल्हाधिकाऱ्यांसोबत ते आढवा बैठक घेतील.
महाराष्ट्रामध्ये मागील दोन आठवड्यांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींसंदर्भात भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व करण्याची आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर का देण्यात आली याबद्दलचा खुलासा केलाय. माहाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी बंडखोरी केल्यानंतर २९ जून रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच शरद पवारांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यामागील कारण सांगितलं. येथे वाचा सविस्तर वृत्त…
…म्हणून तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंचं नाव निश्चित केलं; शरद पवारांचा खुलासाhttps://t.co/s5zrAOYIno
— LoksattaLive (@LoksattaLive) July 11, 2022
शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिली माहिती#SharadPawar #UddhavThackeray #NCP #Shivsena
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार हे ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. तशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. वाचा सविस्तर
सदनिकेचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा तीन लाख चार हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली. चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून चोरट्याचा शोध सुरू आहे. वाचा सविस्तर बातमी…
“राज्य सरकारमध्ये मनसेला मंत्रिपद देण्याची हालचाल सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. यापुर्वीच्या निवडणुकांमध्ये मनसे हा भाजपा, रिपब्लिकन पक्षासोबत कधीच नव्हता. त्यामुळे मनसेला मंत्रिपद देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशाही परिस्थितीत मनसेला मंत्रिपद देण्यात येत असेल तर आमचा त्याला विरोध असेल.”, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण स्पष्ट केली. वाचा सविस्तर बातमी…
नातेवाईकाने ४० हजार रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर रक्कम आणि त्यावरील व्याज असे एक लाख रुपये भरले नाही, म्हणून ऑनलाईन कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून एका महिलेच्या छायाचित्रात बदल करून ते छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करणार असल्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…
नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने ५० रुपये गॅस दरवाढ आणि राज्यातील शिंदे सरकारने वीज दरवाढ तसेच जेवणावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज(सोमवार) पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी गरिबी, महागाई आणि बेरोजगारी नावाचे मुखवटे घालून तरूणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी…
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या कालावधीत नोव्हेंबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकींनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेली बंडखोरी अनेकांना आठवली. याचवरुन शरद पवारांना, “अजित पवारांचं बंड मोडण्यात तुम्हाला यश आलेलं मग उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत?” असा प्रश्न विचारण्यात आला असता ते काय म्हणाले जाणून घ्या… येथे वाचा सविस्तर वृत्त…
अजित पवारांचं बंड मोडण्यात तुम्हाला यश आलेलं मग उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत?; शरद पवार म्हणाले, “आमच्यात काही…”https://t.co/g5Nfjfd3Bs
— LoksattaLive (@LoksattaLive) July 11, 2022
जाणून घ्या त्या बंडासंदर्भात विचारलं असतं पवारांनी काय म्हटलंय…#SharadPawar #AjitPawar #Eknath_Shinde #Maharashtra #NCP #Shivsena
महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात पुकारलेलं बंड आणि त्यानंतर राज्यात झालेलं सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवर बंडखोर शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद अगदी न्यायलयापासून विधानसभेपर्यंत सर्वच ठिकाणी सुरु आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातील खटला ते आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूने झाडल्या जात असतानाच ४० आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतरही न्यायलयीन लाढाई आणि आरोप प्रत्यारोप सुरु असून याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या सत्तासंघर्षामध्ये त्यांच्या पाठिशी असणाऱ्या शिवसेनेच्या १५ आमदारांना एक विशेष पत्र पाठवलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.
शिवसेना विरुद्ध शिंदे : "आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबातचा…"; उद्धव ठाकरेंकडून 'त्या' १५ आमदारांना पत्रhttps://t.co/UGMszK1yZX
— LoksattaLive (@LoksattaLive) July 11, 2022
उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या या पत्रात नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या…#UddhavThackeray #Eknath_Shinde #Shivsena #MLA
२०१९ साली शिवसेना – भाजपाने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना-भाजपा एकत्र सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची भावना होती. मात्र, त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस राष्ट्रवादीशी धरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नव्हती का?, असा सवाल शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून नेमणूक केलेल्या भरत गोगावले यांनी विचारला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
शिंदे गटातील बंडखोर शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या कारचा अपघात झाला आहे. भरत गोगावले यांचा ताफा ईस्टर्न-एक्स्प्रेसवेवरुन निघालेला असताना आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. रस्त्यात टॅक्सी बिघडल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही.
विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असल्याने शिंदे गटातील १६ आमदारांना दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांकडे दाखल याचिकांवर सुनावणीसाठी विनंती केली असता हे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान सुप्रीम कोर्टाने घटनापीठीकडे प्रकरण सोपवावं लागेल सांगताना त्यासाठी अवधी लागणार असल्याचंही म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे अपेक्षित नाही सांगत त्यांनी नाराजी जाहीर केली आहे.
‘पीएमपी’ प्रवाशाच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. याबाबत सचिन गुरव (वय-४५, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…
शिवसेनेतून बंड केलेल्या १६ आमदारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशिवाय आमदारांवर कोणताही कारवाई करु नये, अशी सूचना सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदारांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे. वाचा सविस्तर
शिवसेनेची परिस्थिती केवीलवाणी झाली. ज्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावात १६४ मतं मिळाली, तेव्हा शिवसेने सर्व केसेस मागे घ्यायला हव्या होत्या. सरकारला बहुमत मिळालं आहे. कोर्टाची सूचना म्हणजे सरकारला हा दिलासा आहे. माझी शिवसेनेला विनंती आहे, की केसेस मागे घ्याव्यात आणि जनादेशाचा आदर करावा, असे बावनकुळे म्हणाले.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे (एमआरव्हीसी) पनवेल – वसईदरम्यानचे चौपदरीकरण, सीएसएमटी – पनवेल उन्नत जलद मार्गिका हे दोन्ही महत्त्वाचे प्रकल्प नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. मात्र हे प्रकल्प व्यवहार्य नसल्यामुळे गेली १० वर्षे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळा शकलेली नाही. परिणामी, एमआरव्हीसीला हे प्रकल्प राबविणे अशक्य बनले असून पनवेल-वसई आणि हार्बरवरील सुखकर प्रवासाचे स्वप्न भंगले आहे. वाचा सविस्तर बातमी…
महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी पुकारलेलं बंड आणि त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी मागील आठवड्यात नागपूर दौरा केला. मतदारांचे आभार मानण्यासाठी फडणवीसांनी नागपूर दौरा केल्याचं सांगितलं. या दौऱ्यादरम्यान प्राकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी फडणवीसांचं अभिनंदन करणाऱ्या बॅनर्सवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो दिसत नव्हते. हा विषय राजकीय वर्तुळामध्ये चांगलाच चर्चेत आहे. असं असतानाच आता यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त…
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी राज्यातील सत्तांतरनाट्य, देशातील विरोधकांची भूमिका, श्रीलंकेतील अराजक आणि न्यायप्रक्रियेबाबत कायदे अभ्यासकांकडून होत असलेली चिंता आदी मुद्द्यांवर त्यांनी मते व्यक्त केली. नव्या सरकारमधील प्रमुखांकडून येत्या विधानसभा निवडणुकीत २०० जागा निवडून आणू, आदी होत असलेल्या विधानावरही त्यांनी मिश्कीलपणे भाष्य केले. येथे वाचा सविस्तर वृत्त…
२०० आमदार निवडून आणण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “मला वाटतं त्यांचं चुकलं काहीतरी, आपली…”https://t.co/zvlr0YvGU4
— LoksattaLive (@LoksattaLive) July 11, 2022
शिंदे यांनी विधानसभेत केलेलं हे वक्तव्य#ekanthshinde #SharadPawar #NCP #BJP #Shivsena
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडा नगर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘छेडा नगर रस्ते सुधार प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत शीव – ठाणे उड्डाणपुलाचे २१ टक्के, तर मानखुर्द – ठाणे उड्डाणपुलाचे ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता निर्धारित वेळेत दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्याचा एमएमआरडीएचा मनस आहे. हे उड्डाणपूल सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. वाचा सविस्तर बातमी…
मुंबईमध्ये आज (सोमवार) सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली असून दिवसभर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…
ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा होणाऱ्या बारवी धरणाच्या पाणी पातळीत गेल्या ११ दिवसात समाधानकारक वाढ झाली आहे. गेल्या ११ दिवसात धरणात तब्बल १३.६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बारवीचा पाणीसाठा थेट ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. १ जुलै रोजी बारवी धरणात १०६ दशलक्ष घनमीटर इतके पाणी होते. तर ११ जुलै रोजी धरणात १५२ दशलक्ष घनमीटर इतके पाणी आहे. त्यामुळे पाऊस असाच पडल्यास याच महिन्यात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा आहे. वाचा सविस्तर बातमी…
महाराष्ट्र Live Update