सिंचन संघर्ष समितीचा इशारा हिंगोली : जिल्हयाचा सिंचन अनुशेष असताना कयाधू नदीचे पाणी इतरत्र वळविण्याचा घाट घातला जात आहे. मात्र नदीचे पाणी इतरत्र वळविल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा इशारा सिंचन संघर्ष समितीने दिला आहे.हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन प्रश्नावर माजी खासदार शिवाजी माने यांनी कयाधू नदीपात्रात उपोषण केले होते. या प्रश्नाबाबत नांदेड येथे बैठक घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. नांदेड येथे झालेल्या बैठकीस माजी खासदार माने, सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप चव्हाण,निमंत्रक शिवाजी माने,नंदकिशोर तोष्णीवाल,सदाशिव चौतमाल,डिगांबर कदम तसेच पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एच. कचकलवार,उध्र्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शेख,कार्यकारी अभियंता नखाते,कार्यकारी अभियंता खडके उपस्थित होते. जिल्ह्याचा अनुशेष मंजूर झाल्यानंतरही त्यावर कार्यवाही न करता कयाधूनदीचे पाणीवळविण्याचा घाट घातला जात आहे. कयाधूचे पाणी इतरत्र वळविल्यास हिंगोली जिल्हयाचे वाळवंट होणार असल्याचे माने, चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. चिखली ते समगा गावापर्यंत उच्चपातळी बंधारे बांधावेत. इसापूर धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी द्यावी. रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला मान्यता द्यावी. जिल्ह्यातील पाझर तलावांची दुरुस्ती करावी अशा मागण्याही बैठकीत करण्यात आल्या. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आश्वासन दिले.