राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरील अटकेच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. "हे प्रकरण २० वर्षांपूर्वीचं जमीन व्यवहाराचं आहे. मात्र, आरटीआयमध्ये मलिकांनी आरोप केल्याप्रमाणे काहीही केलं नसल्याचं उत्तर आलं आहे," असा दावा शरद पवारांनी केला. तसेच मलिक सरकारविरोधात बोलत होते म्हणूनच कारवाई झाल्याचा आरोप केला. ते मंगळवारी (२३ ऑगस्ट) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. नवाब मलिकांवरील कारवाईवर बोलताना शरद पवार म्हणाले, "नवाब मलिकांनी काय केलं होतं? नवाब मलिकांची एकच चूक होती ती म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते होते. ते प्रामाणिकपणे दररोज जिथं कुठं चुकीचं होईल ते लोकांसमोर ठेवण्याचं काम करत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली." "२० वर्षांपूर्वी एक जमीन खरेदीचा व्यवहार झाला होता आणि…" "हे प्रकरण काय होतं, तर २० वर्षांपूर्वी एक जमीन खरेदीचा व्यवहार झाला होता आणि त्यात त्यांनी काहीतरी केलं होतं. मी मलिकांनी नेमकं काय चुकीचं केलं ही माहिती मागितली, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही," असं शरद पवारांनी सांगितलं. "आरोप आहेत तसं कोणतंही काम मलिकांनी केलेलं नाही" शरद पवार पुढे म्हणाले, "आम्ही देशात माहितीच्या अधिकाराचा कायदा केला. त्यानुसार कोणत्याही नागरिकाने माहिती मागितली तर ती दिली जाते. नवाब मलिकांनी चुकीचं काम केल्याचा आरोप करून जेव्हा कारवाई झाली तेव्हा आमच्या काही सहकाऱ्यांनी माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार माहिती मागितली. त्यावर उत्तर आलं त्यांच्यावर जे आरोप आहेत तसं कोणतंही काम त्यांनी केलेलं नाही. असं लेखी उत्तर मिळालं आहे." हेही वाचा : “१०० कोटीचे आरोप एक कोटी १० लाखावर आले आणि…”, अनिल देशमुखांच्या अटकेबाबत शरद पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले… "चुकीच्या गोष्टी बोललो असेल तर बदनामीचा खटला करावा" "हे काय आहे? लोकशाहीत, राजकारणात विरोधात बोलण्याचा अधिकार नाही का? आम्ही चुकीच्या गोष्टी बोललो असेल तर बदनामीचा खटला करावा. मात्र, तसं न करता गृहमंत्र्यांना मागील १० महिन्यापासून तुरुंगात डांबण्यात आलं. त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्यात आला," असाही आरोप शरद पवारांनी केला.